डी. डी. न्यूज प्रतिनिधी :
दि. १९ एप्रिल २०२३
आसाम यूथ काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. अंगकिता दत्ता यांनी युथ कॉंग्रेसच्या दोन नेत्यांविरुद्ध महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. यूथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीवी आणि प्रभारी सचिव वर्धन यादव यांच्याविरोधात हा छळवणुकीचा आरोप त्यांनी केला आहे. केंद्रीय पक्ष नेतृत्वाने त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे डॉ. दत्ता यांनी महिला आयोगाकडे धाव घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
“मी एक महिला नेता आहे, महिला असल्यामुळे श्रीनिवास बीवी आणि वर्धन यादव हे मला तुच्छतेची वागणुक देत आहेत. याबाबत मी राहुल गांधी यांच्याकडेही तक्रार केली होती, पण त्यानंतरही काही कारवाई झाली नाही. माझ्याशी संवाद साधताना हे दोन्ही नेते ‘ए लडकी’असा उल्लेख करीत असतात. रायपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात या दोन्ही नेत्यांनी माझ्याशी बोलताना अपमानकारक शब्दांचा वापर केला आहे. त्यामुळे मी त्रस्त झाले आहे. “तु काय पीते, कुठली दारु पीते,” अशा प्रकारचे प्रश्न ते विचारतात. भारत जोडो यात्रेत जेव्हा मी सहभागी झाले होते, तेव्हा त्यांच्याविरोधात मी खुद्द राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली होती. पण त्यानंतरही कुठलीही कारवाई झाली नाही. सहा महिन्यांपासून मला ते अशा प्रकारचा त्रास देत आहेत” अशी तक्रार डॉ. अंगकिता दत्ता यांनी महिला आयोगाकडे केली आहे.
“माझे वडील, आजोबा हे राज्य काँग्रेसचे अध्यक्ष होते. अशी पार्श्वभूमी असताना पक्ष सोडण्याची आमची इच्छा नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही आम्हाला पक्षाच्या बाहेर काढू शकता, पण आमचे पक्षावर प्रेम आहे”, असेही डॉ. दत्ता म्हणाल्या.
डॉ. दत्ता पुढे म्हणतात, “आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासोबतचे काही पोस्टर त्यांच्याकडून तयार केले जात आहेत. त्यांच्यासोबत संगनमत करीत असल्याचा आरोप वर्धन यादव यांनी माझ्यावर केला आहे.” डॉ. अंगकिता दत्ता आसामचे माजी मंत्री अंजन दत्ता यांच्या कन्या आहेत. ते काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. डॉ. अंगकिता यांनी काँग्रेसकडून अममुरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली आहे.