मुंबई प्रतिनिधी :
दि. ३० मार्च २०२४
प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊत यांच्यावर आरोप केले आणि आता सुषमा अंधारे यांनी प्रश्न विचारत त्यांच्यावर टीका केली आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. या
टीकेवरून सुषमा अंधारे यांनी प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारत उलट टीका केली आहे. अंधारे म्हणाल्या, “संजय राऊत आमच्या पक्षासाठी
चिलखत आहेत आणि तुमच्यापेक्षा आम्ही शंभर पावलं पुढे चाललो आहोत. पण, तुम्ही किमान आहात त्या जागेवर तरी थांबा!”
राज्यातील महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामधील चर्चा जवळपास फिस्कटल्यातच जमा आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून
आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांना आता सुषमा अंधारे
यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
सुषमा अंधारेंनी प्रकाश आंबेडकरांना उलटपक्षी प्रश्न विचारले आहेत. त्या म्हणतात की, मुंबईत सभा झाली तिथे वंचितने उद्धव ठाकरे यांना
निमंत्रण का दिलं नव्हतं? काँग्रेसशी पटत नसलं तरी त्यांना तुम्ही बोलावलं. आम्ही वंचितला आधी चार, मग पाच जागा दिल्या होत्या. आम्ही
शंभर पावलं चाललो, तुम्ही निदान आहात त्या जागेवर तरी थांबा. तुम्ही मागे जात असाल तर ही कसली दोस्ती?
ठाण्यात दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फॉर्म भरला तरी ठाण्याची जागा आम्हीच निवडून आणू, असं खुलं आव्हान सुषमा अंधारे यांनी
भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला दिलं. स्मृती इराणी, कंगना रनौत, नवनीत राणा हे सारे चित्रपट क्षेत्रातून आलेत, त्यामुळे व्यवसायावरून
कोणी कोणावर टीका करण्यात अर्थ नाही, असेही त्या पुढे म्हणाल्या. विजय शिवतारे यांचा स्क्रिप्ट रायटर कोण आहे याचा आधी अजित पवार
यांनी शोध घ्यावा. विजय शिवतारे यांचे स्क्रिप्ट रायटर अगदी अजित पवारांच्या आजूबाजूलाच बसलेले आहेत की काय हे नक्की पाहावं.
या देशातलं दळभद्री सरकार हुकूमशाही करत असून भ्रष्टाचार, संविधानाची हत्या होते आहे. यासाठी आम्ही एक लढाई करतोय आणि
बाळासाहेब आंबेडकरांशिवाय ही लढाई पूर्ण होऊ शकत नाही. संविधानाची रक्षा करणे ही फक्त आमची जबाबदारी नाही तर ती
आंबेडकरांचीसुद्धा आहे. मी पूर्ण खात्रीने सांगू शकते की भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल, अशा प्रकारचं कोणतंही पाऊल
आंबेडकरांकडून उचललं जाणार नाही. आंबेडकर आणि आमचे विचार एक आहेत, पक्के आहेत.
प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट शब्दांत संजय राऊतांना विचारले होते, “संजय, किती खोटं बोलणार? तुमचे आणि आमचे विचार एकच आहेत, तर
आम्हाला बैठकीला का बोलावत नाही? सहा मार्चला फोर सीझन्स हॉटेलातल्या बैठकीसाठी आमच्या प्रतिनिधींना का आमंत्रण आलं नव्हतं?
आजही वंचितला आमंत्रणा न देता कशी काय बैठक घेऊ शकता? तुमचे आम्ही सहकारी असूनही पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलंत.
सिल्व्हर ओकवरील बैठकीत काय वागणूक होती तुमची? आमच्या विरोधात उमेदवार देण्याचं आपण अकोल्यात बोललात हे खरं नाही का?
एकीकडे आघाडीचा आभास आणि दुसरीकडे आम्हालाच पाडण्याचा कट रचता का?”