मुंबई प्रतिनिधी :
दि. ०४ एप्रिल २०२४
महाविकास आघाडीत तीन जागांचा तिढा अजूनही सुटत नाहीसे दिसते आहे. त्यासाठी काल (बुधवारी) प्रमुख नेत्यांची खलबतेही झाली. मात्र शिवसेना उध्दव ठाकरे गटाने जाहीर केलेल्या कुठल्याही जागेबाबात फेरविचार करण्यास स्पष्ट नकार दिल्याने जागा वाटपाचा तिढा तसाच राहिला आहे.
उत्तर मुंबईची जागा लढविण्यास काँग्रेसचा नकार आहे. तसेच दक्षिण मध्य मुंबईची जागा शिवसेनेने सोडावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसची शिवसेनेकडे (ठाकरे गट) केली आहे. त्यामुळे अजूनही मध्य मुंबई , सांगली आणि भिवंडी या तीन जगांबाबत मार्ग निघू शकलेला नाही.
महाविकास आघाडीची यापूर्वी जाहीर झालेली संयुक्त पत्रकार परिषद आज रद्द केली गेली. मात्र ठाकरे गटाने स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन चार उमेदवारांच्या नावांची घोषणाही केली. यावेळी त्यांनी उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसने त्यांचे उमेदवार जाहीर करावेत, असे आवाहन केले.
काँग्रेसला उत्तर मुंबई हा मतदारसंघ आजिबात नको आहे आणि ती जागा शिवसेनेने लढवावी असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र दक्षिण मध्य मुंबईची जागा आपल्यासाठी सोडावी, अशी मागणी काँग्रेसने या बैठकीत केली. तसेच काँग्रेसचा सांगलीबद्दलचा आग्रहही कायम आहे. भिवंडीची जागा राष्ट्रवादीला द्यावी अशी मागणी त्यांनी केली. ही बैठक शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झाली. या बैठकीला पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत आणि जयंत पाटील उपस्थित होते.
दरम्यान महाविकास आघाडी या जागांवर तोडगा काढण्यासाठी बैठकांवर बैठका घेत आहे. या जागांवरील तिढा सोडवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली जात आहे. मात्र, कालही या जागांबाबत घेतलेली बैठक शेवटी निष्फळ ठरली आहे.
सांगली आणि दक्षिण मध्य-मुंबई या जागेवरून माघार न घेण्यावर ठाकरे गट हा ठाम असल्याची माहिती आहे. तर भिवंडी आणि सातारा या जागेसाठी शरद पवार गटाची आग्रही भूमिका कायम आहे. या पूर्वी देखील शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या घरी पार पडलेली ६ तासांची बैठक निष्फळ ठरली होती.
सांगली, भिवंडी, सातारा आणि दक्षिण मध्य मुंबई या चारही जागांवर अद्यापही तोडगा निघालेला नाही. या लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम आहे.