नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. ११ एप्रिल २०२४
लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर होणार्या आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच दिवसेंदिवस दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होत आहे. त्यांच्या पाठीमागील अडचणीचा ससेमिरा सुटतच नाहीये.
केजरीवाल यांनी आठवड्यातून पाच वेळा वकिलांना भेटण्याची कोर्टाकडे मागितलेली परवानगी कोर्टाने बुधवारी फेटाळून लावली. त्यातचदिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेल्या राज कुमार आनंद यांनी बुधवारी आपल्या मंत्रीपदाचा त्याबरोबरच ‘आप’च्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल तुरुंगात गेल्यापासून दिल्ली सरकार व आम आदमी पक्षामध्ये खूप काही घडते आहे. काही दिवसांपूर्वी राजकुमार आनंद यांच्या घरावर ईडीचा छापा पडला होता. त्यानंतर त्यांनी आता मंत्रिपदाचा राजीनामा देऊन पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे केजरीवाल व ‘आप’च्या अडचणी वाढल्या आहेत.दिल्लीत समाजकल्याण आणि कामगार मंत्री असलेल्या राज कुमार आनंद यांच्या घरी ईडीने गेल्यावर्षी ३ नोव्हेंबर रोजी छापेमारी केली होती. या छापेमारीनुसार ७ कोटींहून अधिकची सीमाशुल्काची चोरी केल्याचा आरोप आनंद यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, बुधवारी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी त्यांच्या जामीनासाठी केलेली याचिकाही कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे बुधवारी दिवसभरात तीन धक्के केजरीवालांना सहन करावे लागले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मद्य घोटाळ्या प्रकरणी अटकेत आहेत.
न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांचा जामीन फेटाळलेला असला तरी, केजरीवालांनी अटकेत असताना देखील आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला नाही. ते तुरुंगातूनच सरकार चालवत आहेत. त्यामुळे केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवावे अशी याचिका दिल्ली हायकोर्टमध्ये दाखल करण्यात आली होती.पण, हायकोर्टाने याचिकाकर्त्याला खडे बोल सुनावून 50 हजार रुपयांचा दंड देखील ठोठवला.