रत्नागिरी प्रतिनिधी :
दि. १८ एप्रिल २०२४
अखेर महायुतीचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला असून भाजपकडून केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची समजूत काढण्यात युतीच्या नेत्यांना यश आल्याने भाजप नेते नारायण राणे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला. उदय सामंत हे एकनाथ शिंदे गटाचे मंत्री आहेत. एवढेच नव्हे तर किरण सामंत आणि उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण युतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.
भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या 13 व्या यादीत नारायण राणेंच्या उमेदवारीचा उल्लेख आहे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि नारायण राणेंमध्ये थेट लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
भाजप आणि शिंदे गटात अनेक दिवसांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू होती. ‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग आमचाच, भावी खासदार किरण सामंत’ अशा स्वरूपाचे स्टेटस शिंदे गटाकडून ठेवण्यात आले होते. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा किरण सामंत यांना फायनल झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु आज पत्रकार परिषद घेऊन, उदय सामंत आणि किरण सामंत यांनी आपण लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली असून, युतीच्या उमेदवराचं काम करणार असल्याचं जाहीर केलं.
रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड व मावळ या तीनही लोकसभा जागांवर भाजपचे कमळ फुलणार, असं वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलं होतं. भाजपकडून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता.
शिवाय असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला होता की, रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड आणि मावळवर अन्याय होऊ नये असे सांगत देवेंद्रजी यांनी, या वेळेस कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यानुसार भाजपने कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करत अखेर राणेंना उमेदवारी दिल्याचं पाहायला मिळत आहे.