नंदूरबार प्रतिनिधी :
दि. १० मे २०२४
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीची धामधूम चालू असताना एक मोठं वक्तव्य केलं होतं. काही प्रादेशिक पक्ष लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं शरद पवार यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. राजकारणात त्यांच्या या विधानानंतर चर्चांना उधाण आलं. यानंतर शरद पवारांच्या या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट शरद पवारांनाच एनडीएमध्ये येण्याची मोठी ऑफर दिली आहे.
महायुतीच्या उमेदवार हिना गावीत यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नंदूरबारमध्ये सभा पार पडली. शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटावर या सभेत बोलताना मोदी यांनी टीका केली. “नकली शिवेसना मला जिवंत गाडण्याची भाषा करते. मात्र, मी बाळासाहेब ठाकरे यांना जवळून पाहिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांना आज किती दु:ख होत असेल”, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. यानंतर शरद पवारांच्या विधानावर त्यांनी भाष्य केले.
“४० ते ५० वर्षांपासून राजकारणातील महाराष्ट्राचे एक मोठे नेते सध्या काहीही भाष्य करत आहेत. ते बारामतीच्या निवडणुकीनंतर चिंतेत असावेत. त्यांनी ते विधान अनेक चांगल्या लोकांबरोबर काही विचार विनिमय करून केले असावे. छोट्या-छोट्या पक्षांना ४ जूननंतर राजकारणात टिकून राहायचं असेल तर काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागू शकतं, असं त्यांना वाटलं असेल”, असंही मोदी म्हणाले.
“शरद पवार यांनी विधान केलं होतं, छोटे छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजेत. नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे मन तयार केलंय असा त्यांच्या विधानाचा अर्थ आहे. मात्र, ४ जूननंतर काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा मी त्यांना सांगतो, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या. सर्व स्वप्न पूर्ण होतील”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
“पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी जवळीक साधतील, किंवा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी सर्वोत्तम आहे असे त्यांना वाटेल” असे ते म्हणाले होते. तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरू विचारसरणीचे आहोत. मी आता काहीही बोलत नाही. सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही त्यांच्या (काँग्रेसच्या) जवळ आहोत. पक्षाबाबतचे पुढील सर्व निर्णय सामूहिकपणे घेतले जातील”, असे सूचक भाष्य शरद पवार यांनी केले होते.