मुंबई प्रतिनिधी :
दि. १४ मे २०२४
देवेंद्र फडणवीसांसारखा कोहिनूर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी निवडला आहे. डबल सीएम असा अर्थ डीसीएमचा आहे. देशाची आन, बान आणि शान म्हणजे महाराष्ट्र आहे आणि त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीसांनाच जातं असं वक्तव्य जैन मुनी आचार्य नयपद्मसागरजी महाराज यांनी केलं आहे. शिवाय ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी विषाचा घोट महाराष्ट्रासाठी पचवला आहे.
एका जैन मंदिरात दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी छोटेखानी सभा घेण्यात आली. नयपद्मसागरजी यांनी या सभेत मुंबईतल्या जैन बांधवांना भाजपाला मतदान करण्याचं आणि महायुतीच्या पाठिशी उभं राहण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्र आहे तर भारत आहे. महाराष्ट्रातील मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे हे नमूद करून, “धूप मे तपना मंजूर है पर नरेंद्र मोदीजी को एक वोट कम गिरना मंजूर नहीं” असंही वक्तव्य त्यांनी केलं.
महाराष्ट्रासाठी विषाचा घोट देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. तोपर्यंत कोणी महाराष्ट्राच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही जोपर्यंत फडणवीस महाराष्ट्रात आहेत . फडणवीस यांनी साथ दिलेल्यांनीच त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, असे आचार्य नयपद्मसागरजी महाराज यांनी म्हटले.
महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांना जिंकून आणण्यासाठी दक्षिण मुंबईमध्ये भाजप मोठ्या प्रमाणात कामाला लागलेली आहे. या मोहीमे अंतर्गत सोमवारी विशेष संपर्क अभियान जैन मंदिरात पार पडले. या अभियानाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव आणि मंत्री मंगल प्रभात लोढा हे उपस्थित होते. विशेष संपर्क अभियान, दक्षिण मुंबईतील जैन मतदार महायुतीकडे वळवण्यासाठी राबवले जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात विरोधकांना टोले लगावले. “नयपद्मसागरजी यांचा आशीर्वाद माझ्या एनर्जीचा स्रोत आहे. ज्यांनी जैन समाजाला मुंबईत शिव्या दिल्या, त्यांना जैन समाजाची ताकत कळाल्यानंतर वांद्र्यावरुन येऊन गुरुजींचं दर्शन त्यांनी घेतलंय. मुंबईत जैन समाज जर मतं देण्यासाठी आला, तर आम्हाला कोणी थांबवू शकणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र हा सार्या राष्ट्राला प्रेरणा देतो. सांस्कृतिक पुनरुत्थान देशात होत आहे. मोदींच्या ध्येयाला पुढं नेण्यासाठीसार्यांनी एकत्र आलं पाहिजे. उध्दव ठाकरे ज्या पेपरला मुलाखत देतात तो पेपर कोणीही वाचत नाही. ठरलेले लोक मुलाखत घेतात. आम्ही त्या पेपरकडे बघतही नाही, असेही फडणवीस यांनी म्हणाले.