लातूर प्रतिनिधी :
दि. ३० जुलै २०२४
आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता शरद पवार आगीत तेल उतरण्यासाठी उतरले आहेत अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. नामांतराच्या मुद्द्यावरुन प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर टीका केली. लातूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव रॅली होती. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधत असताना शरद पवारांवर हा गंभीर आरोप केला.
गेल्या दीड वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात चर्चेत आहे. त्यासाठी मनोज जरांगेंनी लढा उभा केला. सरकारने त्यानंतर त्यांना आरक्षण दिलं. मात्र त्यांना ते आरक्षण मान्य नाही. सगेसोयऱ्यांसह ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण हवं आहे अशी मनोज जरांगेंची आग्रही मागणी आहे. लक्ष्मण हाके यांनीही काही महिन्यांपूर्वी ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वीच ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी योग्य आहे का? शरद पवारांसह इतर दोन पक्षांची त्यावर भूमिका काय? असं विचारलं. शरद पवारांनी मात्र त्यावर थेट उत्तर दिलेलं नाही. हाच मुद्दा उपस्थित करत आता प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार आगीत तेल ओतत असल्याचं म्हटलं आहे.
“आरक्षणाच्या मुद्द्यावर आता तेल ओतण्यासाठी शरद पवार उतरले आहेत. आता नामांतराचा मुद्दा काढण्याचं कारणच काय? नामांतर होऊन इतकी वर्षे झाली आहेत. तो मुद्दा फुले, शाहू, आंबेडकरवादी यांना उचकवण्यासाठी काढला आहे का? शरद पवार यांना हा मुद्दा आत्ता उपस्थित करुन काय साध्य करायचं आहे? बऱ्याच वर्षांपूर्वीचा नामांतराचा मुद्दा होता. ठरवून त्या मुद्द्याला शरद पवार हवा देत आहेत. ते या माध्यमातून राज्यातील पुरोगामी विचारांच्या लोकांना उचकवण्याचं काम करत आहेत.” असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे यांनाही सल्ला दिला आहे. मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणुकीत २८८ जागा लढवल्या पाहिजेत, त्यांनी हा पर्याय त्यांची मागणी मान्य झाली नाही तर स्वीकारला पाहिजे. सर्वसामान्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी, मराठ्यांना न्याय देण्यासाठी मनोज जरांगेंनी २८८ जागांवर निवडणूक लढवली पाहिजे. राज्यातील गरीब मराठ्यांचे प्रश्न श्रीमंत मराठा समाज दाबून टाकतो आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर मनोज जरांगेंनी निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे असा सल्ला लातूरमधून प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना दिला आहे.