ठाणे प्रतिनिधी :
दि. २० ऑगस्ट २०२४
बदलापुरात चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचारानंतर बदलापूर शहरासह संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त होत आहे. यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी इतका गंभीर गुन्हा दाखल करुन घेण्यास १२ तास का लावले असा संतप्त सवाल केला आहे.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील शाळेत ४ वर्षांच्या आणि एका ६ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण बदलापूर शहरात संतापाची लाट उसळली असून शहरातील नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. शाळेबाहेर मोठ्या संख्येने लोक एकत्र येत आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आता या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. इतका मोठा गुन्हा झालेला असताना पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास १२ तास का लावले असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.
तसंच आपल्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला असून आरोपीला कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत हा विषय लावून धरण्याचं, या विषयात लक्ष घालण्याचंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
पुढे राज ठाकरे म्हणाले, ‘बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले ? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या ….’
जनता, बदलापूर शहरातील शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात रस्तावर उतरली आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. शाळेबाहेरील आंदोलनाबरोबरच लोकांनी रेल्वे रुळावर उतरुनही आंदोलन केलं. रेलरोको आंदोलन सुरू केल्यानंतर पोलिसांनी जमावाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला केला. मात्र संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. दरम्यान, आरोपींना आजच फाशी झाली पाहिजे, तोपर्यंत आम्ही जागेवरुन हलणार नाही असे म्हणत विद्यार्थिंनींचे पालक रेल्वे ट्रॅकवर उतरले
दुसरीकडे शाळेबाहेर लोकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे. लोकांनी शाळेत घुसत शाळेची तोडफोड केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. सरकारने हे प्रकरण, चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनता रस्त्यावर उतरल्यानंतर आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले आहेत.