नाशिक प्रतिनिधी :
दि. २७ नोव्हेंबर २०२४
एकीकडे राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याचा ‘सस्पेन्स’ कायम आहे तर दुसरीकडे नाशिकच्या महायुतीतील घटकपक्षांमध्ये पालकमंत्री पदावरून चढाओढ सुरू झाली आहे. नाशिकचे पालकमंत्रिपद महायुतीत शिवसेना शिंदे गटाकडे असल्यामुळे शिंदे गटाकडून, ‘आमचाच पालकमंत्री होईल,’ असा दावा केला जात आहे. तर, शहरात भाजपच्या आमदारांची संख्या अधिक असल्यामुळे आणि सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडे पालकमंत्रिपद असावे, अशी मागणी भाजप महानगरप्रमुख प्रशांत जाधव यांनी केली.
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून, ‘सर्वाधिक आमदार आमचे असल्याने पालकमंत्री आमचाच होईल,’ असा दावा केला जात आहे. आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सर्वत्र, विधानसभा निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर सुरू आहे. महायुतीला दोन तृतीयांश बहुमत मिळाल्याने तीन दिवसानंतरही राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल याचे उत्तर मिळत नाहीये. त्यातच नाशिकमधील महायुतीतील घटकपक्षांमध्ये पालकमंत्रिपदावरून संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे तीनही पक्षांकडून एकाला संधी मिळाल्यास जिल्ह्याला तीन मंत्री मिळण्याची शक्यता आहे. त्यात मावळते पालकमंत्री दादा भुसे, माजी पालकमंत्री छगन भुजबळ आणि गिरीश महाजन हे तिघेही पालकमंत्रिपदासाठी प्रयत्न करीत आहेत. दर बारा वर्षांनी भरणारा सिंहस्थ या पंचवार्षिकमध्ये येत आहे, त्यामुळे हजारो कोटींची विकासकामे शहरात होणार आहेत. नाशिकचे नाव त्यानिमित्ताने जागतिक पातळीवर चर्चिले जाणार आहे.
या सर्व कारणांमुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच, तीनही पक्षांकडून पालकमंत्रिपदावरून दावा केला जात आहे. माजी खासदार हेमंत गोडसे यांनी, पालकमंत्रिपद शिवसेना शिंदे गटाच्या दादा भुसे यांच्याकडेच राहील, असा दावा केला. तर, दुसरीकडे ‘आमचे जास्त आमदार असल्याने आणि सिंहस्थ असल्याने पालकमंत्रिपद भाजपलाच मिळावे,’ अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी केली. यात राष्ट्रवादी अजित पवार गटानेही उडी घेतली आहे. ‘जिल्ह्यात जास्त आमदार राष्ट्रवादीचे असल्याने आम्हालाच पालकमंत्रिपद मिळेल,’ असा दावा रंजन ठाकरे यांनी केला.
आमदारांचा मुंबईत तळ
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चांदवडमध्ये डॉ. राहुल आहेर यांना निवडून दिल्यास मंत्रिपद देईन, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे यंदा डॉ. आहेर यांच्यासह सीमा हिरे, देवयानी फरांदे, अॅड. राहुल ढिकले भाजपमध्ये मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. दुसरीकडे मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत भुजबळ दावेदार असले तरी, अॅड. माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ हे देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. शिवसेनेकडून दादा भुसे यांच्याबरोबरीने सुहास कांदे यांच्याकडूनही दावा केला जात आहे. जिल्ह्यातील सर्व आमदार मुंबई आणि दिल्लीत त्यामुळे तळ ठोकून आहेत.