सन १९९९ साली झालेली महाराष्ट्र विधानसभेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अनेक अर्थाने वेगळी ठरली होती. या आधीच्या पंचवार्षिक निवडणूकीत शिवसेना-भाजप चे सरकार राज्यात सत्तेवर आले होते. प्रथम मनोहर जोशी व त्यानंतर नारायण राणे हे दोन मुख्यमंत्री शिवसेने महाराष्ट्राला दिले. या सरकार मध्ये गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. सन, १९९९ सालच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीला सामोरे जात असताना अनेक घटना, घडामोडी देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकारणात घडल्या होत्या. युती सरकार असल्याने शिवसेना व भाजप एकत्रित निवडणूकांना सामोरे गेले होते. मात्र, सोनिया गांधी यांच्या विदेश मुद्यावरुन काँग्रेस पक्षात राष्ट्रीय स्तरावर फुट पडली होती. त्याचा सर्वात मोठा केंद्रबिंदु महाराष्ट्रात होता. कारण, महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्तरावरील नेते शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यावरुन काँग्रेस मधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. त्यामूळे महाराष्ट्रात काँग्रेस मध्ये मोठ्या प्रमाणावर फाटाफुट झाली होती. त्यामूळे तत्कालीन निवडणूकीत काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही एकमेकांच्या विरोधात निवडणूकांना सामोरे गेले होते. म्हणजेच एकीकडे शिवसेना-भाजप युती व काँग्रेस आणि नव्याने स्थापना झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. या सर्व घटनांमूळे त्यावेळी कोणत्या ही एका पक्षाला किंवा युती-आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. विशेष म्हणजे अनेक जण त्या निवडणूकीत अपक्ष म्हणून ही विजयी झाले होते.
निवडणूकांचा निकाल लागल्यावर शिवसेना-भाजप मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी प्रचंड स्पर्धा व चढाओढ सुरु झाली होती. शिवसेनेतर्फे नारायण राणे तर भाजपतर्फे गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी दोन्ही बाजूने जोरदार प्रयत्न सुरु होते. मात्र, युतीकडे स्पष्ट बहुमत नसल्याने अपक्ष आमदार हे कोण व्यक्ती मुख्यमंत्री असल्यावर जास्त गळाला लागतील याचा ही विचार करण्यात येत होता. त्यामध्ये असे झाले की एकमेकांच्या विरोधात निवडणूका लढविलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूकीच्या निकालानंतर एकत्रित येऊन सरकार स्थापन करण्याच्या तयारीत होते. तसेच, अनेक जण अपक्ष निवडून आलेले आमदार व काही छोट्या-मोठ्या पक्षाचे आमदार ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत जाण्यास इच्छुक होते. दुस-या बाजूला शिवसेना-भाजप ची मुख्यमंत्री पदाच्या चढाओढीमध्ये जादुई आकडा गाठण्यासाठी लागणा-या गोळाबेरीजेची दोन्ही बाजूने प्रचंड प्रयत्न करुन ही जुळवाजुळव होत नव्हती.
मुख्यमंत्री पद हे शिवसेनेला की भाजपाला याबाबत दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सुरु होती. शेवटी, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची जुळवाजुळव निश्चित होत असल्याचे लक्षात आल्यावर आणि युतीमधील दोन्ही पक्षांचे मुख्यमंत्री पदाबाबत एकमत होत नसल्याने शिवसेना-भाजपाने नवा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी निवडायचे ठरविले. त्यावेळी शेतकरी कामगार पक्षास महाराष्ट्रातून एकूण ३ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी एक जागा होती सोलापुर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातील. या सांगोला विधानसभा मतदारसंघातून भाई गणपतराव देशमुख हे विजयी झाले होते. विधानसभेतील सर्वाधिक निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून त्यावेळी गणपतराव देशमुख यांची गणना होत होती. मग, शिवसेना व भाजपच्या नेत्यांनी दोघांचे एकमत होत नसल्याचे पुर्णपणे लक्षात आल्यावर ३ आमदार असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या गणपतराव देशमुख यांना मुख्यमंत्री करण्याचे ठरविले. गणपतराव देशमुख यांचे नाव समोर आल्यावर युती मधील व युती समर्थक आमदारांमध्ये या नावावर सर्वांची सहमती झाली.
त्यानंतर, गोपीनाथ मुंडे हे गणपतराव देशमुख यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री पदाची ऑफर घेऊन गेले होते. मात्र, वैचारिक बैठक पक्की असलेल्या, एकनिष्ठ आणि तात्विक गणपतराव देशमुख यांनी गोपीनाथ मुंडे यांना नम्रपणे नकार कळविला होता. पुढे सत्तेवर आलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये गणपतराव देशमुख हे पणन खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले होते.
तेंव्हा, घरी चालून आलेले मुख्यमंत्री पद स्पष्ट शब्दात नाकारणारे गणपतराव देशमुख हे राजकारणातील एक दुर्मिळ व्यक्तिमत्व म्हणावे असेच आहे. पुण्यात एका कार्यक्रमाप्रसंगी गणपतराव देशमुख यांना मुख्यमंत्री करण्याचा किस्सा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितला होता.
आज गणपतराव देशमुख ९४ वर्षाचे आहेत. सर्वाधिक काळ एकाच मतदारसंघातून व एकाच पक्षातून निवडून येण्याच्या त्यांच्या विक्रमाची विश्वविक्रम म्हणून नोंद झाली आहे. गणपतराव देशमुख यांनी दोन वेळा मंत्री म्हणून महाराष्ट्रात उत्तमरित्या कामकाज केले आहे. पेशाने एक वकिल असणारे गणपतराव देशमुख हे आज राजकीय व सामाजिक जीवनात केलेल्या चांगल्या कामांमूळे एक उल्लेखनिय व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्रभर परिचित आहेत. साधी रहाणी व उच्च विचारसरणी या तत्वाने त्यांनी आज पर्यंतचे संपुर्ण जीवन मार्गक्रम केले आहे.
महाराष्ट्र विधानसभेतील ११ वेळा निवडून आलेले सांगोला तालुक्याचे विश्वविक्रमी माजी आमदार गणपतराव देशमुख यांची देशाच्या राजकीय इतिहासात सदैव नोंद घेतली जाईल, एवढे मात्र नक्की.