मुंबई प्रतिनिधी :
दि. ०४ डिसेंबर २०२४
सचिन उजवा आणि विनोद डावखुरा फलंदाज परंतु दोघेही मुंबईकर आणि खेळात उजवे असल्याने लोकप्रिय आणि सर्वांचे आवडते. दोघांचेही महान गुरु रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाचे उद्घाटन काल झाले. याप्रसंगी सचिन तेंडुलकर यांनी आचरेकर सरांच्या आठवणींना उजाळा दिला आणि अनेक किस्से सांगितले,सरांनी दिलेली शिकवण व संस्कार कोणताही न्यूनगंड मनात न ठेवता, नवोदित खेळाडूंना बहाल करून सरांचे विचार त्यांच्या पश्चात जिवंत ठेवण्याचे काम करत, एक अनोखी आदरांजली आपल्या गुरूंना वाहिली.
खरंतर विनोद कांबळी यांच्याकडे सुद्धा सचिन तेंडुलकर यांच्या सारख्या असंख्य आठवणी आणि किस्से असणारच. पण बोलायची इच्छा असून सुद्धा त्यांना व्यक्त होता आले नाही. याची कारणे अनेक असतील आणि याच्या खोलात अनेकजण कालपासून गेले असतील आणि जातीलही. दिग्गजांच्या पंक्तीत बसण्याची कुवत असणारा विनोद कांबळी यांच्यासारखा खेळाडू स्वतःवर आणि जडणाऱ्या वाईट सवयींवर नियंत्रण ठेवण्यात कमी पडला आणि आपण एका दिग्गज खेळाडूला मुकलो.
चांगल्या सवयी प्रयत्नपूर्वक वाढवून, वाईट सवयींपासून स्वतःला दूर सारावे, हा एक महत्त्वाचा धडा आपण या प्रसंगातून घेऊ शकतो.