पुणे प्रतिनिधी :
दि. १७ जानेवारी २०२५
पुण्याजवळ घडलेल्या दोन भीषण अपघातांमध्ये आत्तापर्यंत 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्याच्या जवळच हे दोन्ही अपघात झाले आहेत. काल (गुरूवारी) जेजुरी जवळची आळंदी – पंढरपूर पालखी महामार्गावर एक अपघात झाला असून त्यात तिघे ठार झाले आहेत. एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला. तर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जेजुरीजवळ झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू
सासवड जेजुरी रस्त्यावर बेलसर फाट्या जवळ उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. काल(गुरूवारी) या ठिकाणी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रमेश किसन मेमाणे (वय वर्षे ६०), संतोष दत्तात्रय मेमाणे (वय वर्षे ४०) आणि पांडुरंग दामोदर मेमाणे (वय वर्षे ६५) हे तिघेजण (रा.बोरमाळ वस्ती), दुचाकीवरून रस्ता क्रॉस करत असताना एसटी बसने त्यांना जोराची धडक दिली. दुचाकीला बसची जोराची धडक बसली. यावेळी दुचाकी काही अंतरावर फरफटत गेली. यामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर तातडीने त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पुणे नाशिक मार्गावर भीषण अपघात, नऊ जणांचा जागीच मृत्यू
तर आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या घटनेमध्ये एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिली त्यामुळे ही घटना घडली. आयशरची धडक बसल्यानंतर मॅक्स ऑटो चेंडू प्रमाणे पुढे फेकली गेली आणि बसला जाऊन धडकली. या भीषण अपघातामध्ये चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर तिघे जखमी आहेत. जखमींना तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
घटनास्थळी आमदार शरद सोनवणे दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहाणी केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, नारायणगावमध्ये ही अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघात फार गंभीर आहे. पुणे नाशिक हायवेवर हा अपघात झाला आहे. एका आयशर टेम्पो चालकाने प्रवासी वाहतूक करणाऱ्या या वाहनाला मागून धडक दिली. ते वाहन पुढे जाऊन एसटीला धडकले आणि या झालेल्या भीषण अपघातामध्ये अनेक जण दगावले. काही जण जखमी झाले आहेत. यामध्ये काही महिलांचा समावेश असल्याचे समजते आहे. हा अपघात गंभीर होता. प्रत्यक्षदर्शींनी याबाबत सांगितलं की या आयशरने, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाला उडवलं आणि तो पळून गेला. पण, पोलिसांनी त्याला शोधण्याचं काम केलं आहे आणि पुढे आयशरला पकडलं आहे. त्यामुळे खरा अपघात या आयशर चालकामुळे घडला आहे, अशी माहिती यावेळी बोलताना आमदार शरद सोनवणे यांनी दिली आहे.