बीड प्रतिनिधी :
दि. १७ जानेवारी २०२५
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडमधील कायदा-सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच मागील 24 तासात घडलेल्या तीन घटनांमुळे बीड पुन्हा हादरलं आहे. व्यापाऱ्यावर हल्ला, दोन सख्ख्या भावांची हत्या आणि युवकाने गोळीबार करुन दहशत माजवण्याच्या प्रयत्न केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
आधी अंबाजोगाई शहरात सुजित सोनी या व्यापाऱ्यावर हल्ला करून लुटण्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आष्टी तालुक्यात जमावाच्या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास काही लोकांनी लोखंडी रॉड, धारदार शस्त्राने दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन संख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एक जण गंभीर जखमी आहे. याप्रकरणी अंभोरा पोलीस अधिक तपास करत आहेत.
अजय भोसले आणि भरत भोसले असे मयताचे नाव असून कृष्णा भोसले हा गंभीर जखमी आहे. हे तिघेही त्यांच्या गावात उभे असताना गावातील आणि बाहेरील काही लोक जमा झाले आणि तीनही भावांवर शस्त्राने हल्ला चढवला. हत्येचं कारण अद्याप समजलं नाही. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
अंबाजोगाईतील मोरेवाडी परिसरात असलेल्या माऊलीनगरमध्ये गोळीबाराची घटना समोर आली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. रेणापूर तालुक्यातील गोविंदनगर येथील रहिवासी असलेल्या गणेश पंडित चव्हाण याने गोळीबार करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
आरोपी गणेश चव्हाण हा नवनाथ कदम आणि त्यांच्या पत्नीला गेल्या काही दिवसांपासून धमकी देत होता. काही दिवसांपूर्वी या युवकाविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला तक्रारही देण्यात आली होती. गणेश चव्हाण शुक्रवारी सकाळी कदम यांच्या घरी आला आणि वाद घालत कदम यांचा मुलगा सिद्धेश्वर यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने ही गोळी त्याला लागली नाही. गोळी झाडणाऱ्या युवकाकडे कुठलाही शस्त्र परवाना नसून त्याने गावठी कट्ट्याचा वापर केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.