मुंबई प्रतिनिधी :
दि. १८ जानेवारी २०२५
मुंबईसह महाराष्ट्रातील मोठ्या शहरात ट्रॅफिकची मोठी समस्या आहे, यावर मार्ग काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. जर पार्किंग स्पेस नसेल, तर कारदेखील मिळणार नाही, महाराष्ट्रात नवा नियम लवकरच लागू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
मुंबई आणि ठाण्यात केबल टॅक्सी लवकरच सुरू होणार आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये बाईक टॅक्सी चालवण्याचीही तयारी आहे. यादरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये वाहनांची वाढती संख्या हे वाहतूक कोंडीचं प्रमुख कारण आहे.
सरनाईक म्हणाले, की १ बीएचके घरात राहणारे लोक रस्त्यावर वाहनं उभी करतात हे समोर आलं आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी, महाराष्ट्र सरकार एक नवीन धोरण लागू करण्याचा विचार करत आहे. या धोरणाअंतर्गत लोकांना कार खरेदी करण्यापूर्वी पार्किंगच्या ठिकाणाची माहिती देणं आवश्यक असेल, जेणेकरून शहरी भागातील वाढत्या ट्रॅफिकची समस्या कमी होऊ शकेल.
सरनाईक म्हणाले, की ज्यांच्याकडे खाजगी पार्किंगची सुविधा नाही ते सार्वजनिक पार्किंगमध्ये जागा सुरक्षित करून कार खरेदी करू शकतात. पण गरीब लोकांनी कार खरेदी करू नये, घेतल्यास त्यांना पार्किंगची व्यवस्था करावी लागेल.
काही लोक या निर्णयाचं कौतुक करतील, असंही सरनाईक म्हणाले. पुढे ते म्हणाले की, कर्जावर खरेदी केलेल्या एक बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहणारे लोक त्यांच्या कार सार्वजनिक रस्त्यावर पार्क करत आहेत, कारण त्यांच्याकडे खाजगी पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वाहनांच्या अनियंत्रित पार्किंगमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत.
सरनाईक म्हणाले, की पार्किंगच्या समस्येमुळे रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलासारख्या आपत्कालीन सेवांमध्येही व्यत्यय येतो. सोसायट्यांमधील मोकळ्या जागांचा वापर पार्किंगसाठी केला जातो, ज्यामुळे आपत्कालीन सेवेत अनेकदा अडथळा येतो. हे धोरण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विरोधात नसून वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये प्रताप सरनाईक परिवहन मंत्री झाले. तेव्हापासून ते वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याअंतर्गत त्यांनी केबल टॅक्सीच्या प्रकल्पावरही चर्चा सुरू केली आहे. त्याशिवाय राज्यभरात बाईक टॅक्सींचे नियम लागू करण्याचीही तयारी सुरू आहे.