मुंबई प्रतिनिधी :
दि. ०७ मार्च २०२५
संजय राऊत यांनी नुकतीच भाजपावर टीका केलीये. भैय्याजी जोशी यांच्या विधानानंतर मोठा गदारोळ निर्माण झालाय. अनेकांनी जोरदार टीका केलीये. मुंबईला महाराष्ट्रातून तोडायचे असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला. संजय राऊत म्हणाले की, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचे आणि मुंबईवरचा मराठीचा जो ठसा आहे तो यांना मिटवायचा आहे, हे काय आता लपून राहिले नाहीये. मुंबईचे महत्व कमी करायचे आहे आणि मुंबई कमजोर करायची आहे. मुंबईतल्या मराठी माणसाची विभागणी करायची आहे. मराठी माणसात फुट पाडून झाली. विभागणीही करून झाली.
पुढे राऊत म्हणाले की, मुंबईमध्ये मराठी माणसाला जागा नाकारण्याचे प्रकार जे करत आहेत, ते भाजपाचेच लोक आहेत. मंगलप्रभात लोढा हे बिल्डर कोणाचे आहेत? हे भाजपाचेच लोक आहेत आणि अशी अनेक नावे आहेत. हे भाजपाचे अर्थ पुरवठादार आणि देगणीदार आहेत. हे भैय्याजी जोशी आणि देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती आहे. मुंबईची भाषा मराठी नाही हे छाती ठोकपणे सांगणे, ही भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे.
प्रशांत कोरटकर, ज्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान केला, तो प्रशांत कोरटकर तुम्हाला अजून का सापडत नाही? त्याला अजून का अटक केली नाही? त्याला कोणी अभय दिले? प्रशांत कोरटकर याचा वावर गृहमंत्र्यांपासून राज्यपालांपर्यंत आणि आयएस अधिकाऱ्यांसोबत आहे. तो नेमका कोणाच्या जीवावर फिरतो असाही प्रश्न यावर संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
तुमचेच आशीर्वाद त्याला असल्याचे राऊत यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले की, राहुल सोलापूरकर हा आरएसएसच्या मुख्यालयात जाऊन बैठका घेतो. त्याने छत्रपती शिवाजी महाराज हे भ्रष्टाचारी आहेत म्हणून सांगितले हा त्याच्या बोलण्याचा अर्थ आहे. काय कारवाई केली देवेंद्र फडणवीसांनी किंवा त्यांच्या सरकारने? अटक केली पाहिजे राहुल सोलापूरकरला. राजद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.