मुंबई प्रतिनिधी :
दि. ०९ मे २०२५
बुधवारी पहाटे भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यानंतर, भारताने जगाला दहशतवादाच्या विरोधात कणखर संदेश दिला. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासोबत दोन महिला अधिकाऱ्यांनी माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली. या अधिकाऱ्यांमध्ये भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा समावेश होता.
कर्नल सोफिया कुरेशी 2016 साली ‘एक्सरसाइज फोर्स 18’ मध्ये भारतीय तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. ही परदेशी भूमीवरची भारताची सर्वात मोठी लष्करी कवायत होती. यात सहभागी झालेल्या 18 देशांतील त्या एकमेव महिला कमांडर होत्या.
कर्नल सोफिया कुरेशी यांनी 2017 मध्ये दिलेला एक जुना इंटरव्ह्यू आता समोर आला आहे. त्यात त्यांनी आपली आर्मीतील पार्श्वभूमी आणि त्यांच्या पालकांनी त्यांना संरक्षण दलामध्ये भरती होण्यास कसे प्रोत्साहन दिले याबद्दल सांगितले आहे.
कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबाला लष्करी इतिहास आहे. त्यांचे वडील सैन्यात होते. त्यांचे आजोबाही सैन्यात होते. तर त्यांच्या पणजी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या सैन्यात होत्या.
काय म्हणाल्या होत्या सोफिया कुरेशी?
कर्नल सोफिया कुरेशी 2017 मध्ये बोलल्या होत्या, “मी एका सैनिकाची मुलगी आहे. त्यामुळे मला आर्मीतील वातावरणाची माहिती आहे. माझे वडील सैन्यात होते, माझे आजोबा सैन्यात होते आणि माझ्या पणजी राणी लक्ष्मीबाईंबरोबर होत्या. त्या एक परिपूर्ण योद्धा होत्या. माझ्या आईची इच्छा होती की आम्ही दोघी बहिणींपैकी कोणीतरी सैन्यात भरती व्हावे. माझे आजोबा नेहमी म्हणायचे की, ‘देशाचे रक्षण करण्यासाठी नेहमी तयार राहणे हे आपले कर्तव्य आहे’.”
कर्नल कुरेशी गुजरातच्या आहेत. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. त्यांचे पती मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये अधिकारी आहेत. मीडिया ब्रीफिंगनंतर, सोफिया यांचे वडील ताज मोहम्मद कुरेशी यांनी ANI ला सांगितले की, त्यांना लेकीचा खूप अभिमान आहे. ते म्हणाले, “आम्हाला खूप अभिमान आहे. आमच्या मुलीने देशासाठी खूप मोठे काम केले आहे. पाकिस्तानचा नाश झाला पाहिजे. माझे आजोबा, माझे वडील आणि मी सगळे सैन्यात होतो. आता ती पण आहे.”
कर्नल सोफिया कुरेशी यांनी भारताच्या बाजूने दिलेली माहिती खूप मोलाची होती. त्यांचे लष्करी पार्श्वभूमी असलेले कुटुंब हे देशासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी केलेले काम हे देशाच्या इतिहासात नेहमीच लक्षात राहील.