पुणे प्रतिनिधी :
दि. २६ मे २०२५
नैऋत्य मोसमी पावसाने राज्याच्या सीमेवर आगमनाची वर्दी देतानाच, शहर आणि परिसरातही रविवारी दिवसभर संततधार कायम राखली.
शनिवारी रात्रीनंतर पावसाचा जोर काहीसा वाढला होता, तर रविवारी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या. शहरापेक्षा जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. दौंड, बारामती या भागांमध्ये खूप ठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.
पुणे शहर आणि जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाळी वातावरण होते. शहरात रात्री साडेआठपर्यंत ७.७ मिलिमीटर आणि लोहगाव येथे १९ मिलिमीटर पाऊस पडला. बारामतीत रविवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत १३०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस हीच परिस्थिती कायम राहणार असून, शहराच्या काही भागांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.
वातावरणातील बदलांमुळे गेल्या आठवडाभरापासून पावसाने पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुक्काम ठोकला आहे. रविवारीदेखील पहाटेपासूनच संततधार सुरू झाली. ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झालेच नाही. दिवसभरात अधूनमधून विश्रांती घेऊन हलक्या आणि मध्यम सरी पडत राहिल्या. सुट्टीसाठी राखून ठेवलेली कामे पावसामुळे रेंगाळली. अनेक जण कारने बाहेर पडल्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. वातावरणातील घडामोडींमुळे कमाल तापमानातही घट झाली होती. हवेतील गारवा वाढल्यामुळे वातावरण आल्हाददायक होते. मध्यवर्ती पुण्यासह उपनगरांमध्ये रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.
पुणे जिह्यात रात्री ८.३० पर्यंत झालेला पाऊस (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये)
दौंड – ९८
लोणावळा – ७६
बारामती – ४९.५
वडगावशेरी – ३४
हडपसर – २५
बालेवाडी – १८.५
कोरेगाव पार्क – ५
एनडीए – ३.५
दरम्यान, मुंबईतही पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून मुंबईत अद्याप मान्सून दाखल झालेला नाही. येत्या तीन दिवसांत मुंबईत मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणातही पावसाने मोठी हजेरी लावली असून यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. नाशिकमध्ये कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे.