नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. ३१ मे २०२५
‘१९७१च्या युद्धात नौदलही उतरल्याने पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळीही आपल्या नौदलाने पाकिस्तानवर वचक ठेवण्याची कामगिरी बजावली. या मोहिमेत आपल्या नौदलावर सक्रिय होण्याची वेळ आली असती तर पाकिस्तानचे चार तुकडे झाले असते,’ अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी पाकिस्तानला ठणकावले.
राजनाथसिंह यांनी शुक्रवारी गोव्याच्या समुद्रात तैनात असणाऱ्या ‘आयएनएस विक्रांत’ला भेट देऊन नौदलाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
आयएनएस विक्रांत ही देशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान या युद्धनौकेने समुद्रात खोलवर गस्त घालून पाकिस्तानी नौदलाचे मनसुबे उधळले होते. या पार्श्वभूमीवर राजनाथ यांनी या युद्धनौकेस भेट देऊन नौदल अधिकाऱ्यांचे कौतुक केले. ‘आपले हवाई दल पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करत असताना नौदलाने अरबी समुद्रात अतिशय आक्रमकपणे युद्धसज्जता राखली होती. यामुळेच पाकिस्तानी नौदल काही आगळीक करण्याचे धैर्य दाखवू शकले नाही,’ असे ते म्हणाले.
‘या मोहिमेदरम्यान भारतीय नौदल सुप्तपणे कार्यरत होते; परंतु या मोहिमेचा प्रत्यक्ष भाग होण्याची वेळ नौदलावर आली असती तर पाकिस्तानचे चार तुकडे झाले असते. पाकिस्तानने भविष्यात भारतासोबत काही आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर भारतीय नौदलाच्या सामर्थ्याची चव त्यांना चाखावी लागेल. याबाबत सरकारने नौदलाला मोकळीक दिली आहे,’ असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला.
‘हाफीज, मसूदला भारताकडे सोपवा’
‘भारतासोबत पाकिस्तानला पुन्हा चर्चा करायची असेल तर त्यांनी प्रथम हाफीज सईद व मसूद अझर या दहशतवाद्यांना भारताकडे सोपवावे. हे दोघे केवळ भारताला हव्या असणाऱ्या दहशतवाद्यांच्या यादीत आहेत असे नव्हे; तर अमेरिकेनेही त्यांना दहशतवादी म्हणून घोषित केले आहे,’ असे राजनाथ म्हणाले.