फलटण प्रतिनिधी : निकेश भिसे
दि. २ जून २०२५
फलटण तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. नुकसानीचे पंचनामे होतील व भरपाई मिळेल या आशेत फलटण तालुक्यातील शेतकरी वाट पाहत होता परंतु भरपाईसाठी पंचनामे करण्यासाठी तलाठी व मंडलाधिकारी तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपर्यन्त पोहचले नाहीत. शेतकऱ्यांनी याबाबत गावातील तलाठ्यांशी संपर्क साधला असता पंचनामे पूर्ण झालेत असे उत्तर मिळाल्याने खरा नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित राहाणार आहे.
फलटण तालुक्यातील अनेक बाधित गावात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भेट देऊन पाहणी करण्यासाठी अनेकांची चढा ओढ लागली होती. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार सचिन पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी अनेक गावात जाऊन पाहणी करून नुकसानीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून भरपाई देण्याची हमी दिली होती.