डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी :
दि. ०४ जून २०२५
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने (RCB) तब्बल 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएल चषक उंचावला. या ऐतिहासिक क्षणाने देशभरातील आरसीबीच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. कोट्यवधींचे कर्ज लाटून देशाची फसवणूक करणारा आरसीबी फ्रँचायझीचा माजी मालक विजय मल्ल्या यानेही सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. बंगळुरुमध्ये IPL ट्रॉफी आणणं हे आपलं स्वप्न होतं, असं मल्ल्याने सांगितलं.
विराट कोहली, ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स यांसारख्या दिग्गज खेळाडूंना निवडण्याचा प्रिव्हिलेज मिळाल्याचेही विजय मल्ल्याने म्हटले आहे. आरसीबीच्या विजयानंतर आनंद महिंद्रा, हर्ष गोयंका आणि निखिल कामथ यांसारख्या शहरातील महत्वाच्या व्यक्तींनी सोशल मीडियावर RCB चे अभिनंदन केले. बंगळुरुमध्ये ‘ई साला कप नमदे’ (या वेळी कप आपलाच) च्या घोषणा आणि फटाक्यांच्या आवाजाने वातावरण उत्साही झाले होते. बंगळुरुने अहमदाबादच्या भूमीवर पंजाब किंग्जवर सहा धावांनी विजय मिळवून 18 वर्षांपासून पाहिलेले स्वप्न पूर्ण केले.
विजय मल्ल्याने RCB च्या विजयानंतर एक्स (ट्विटर) वर आपले मत व्यक्त केले. “जेव्हा मी आरसीबीची स्थापना केली, तेव्हा आयपीएल ट्रॉफी बंगळुरुमध्ये यावी हे माझे स्वप्न होते. मला किंग कोहलीला तरुणपणी निवडण्याचा प्रिव्हिलेज मिळाला आणि तो 18 वर्षे आरसीबीसोबत राहिला हे उल्लेखनीय आहे. मला युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल आणि मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्स यांना निवडण्याचा सन्मान मिळाला, जे आरसीबीच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहेत. अखेर, आयपीएल ट्रॉफी बंगळूरमध्ये आली आहे.” असं विजय मल्ल्याने लिहिलं आहे.
संघ आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन करताना मल्ल्या म्हणाला, की RCB चा संघ संतुलित आहे. RCB च्या चाहत्यांनी IPL ट्रॉफी जिंकण्यासाठी खूप योगदान दिले. माझे स्वप्न साकार करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार. RCB चे चाहते खूप चांगले आहेत आणि ते IPL ट्रॉफीसाठी पात्र आहेत. “ई साला कप बंगळूरु नमदे”
2008 मध्ये विजय मल्ल्याने फ्रँचायझी खरेदी केली होती. कर्ज चुकवल्यानंतर तो भारतातून पळून गेला. त्यानंतर, IPL ने 2016 मध्ये BCCI ला पत्र लिहिले. त्यामध्ये त्याने मल्ल्याने रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (RCSPL) च्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली.
बंगळुरु शहरातील विविध भागांमध्ये ‘ई साला कप नमदे’ (या वेळी कप आपलाच) च्या घोषणांनी वातावरण गुंजले. तरुण आणि क्रिकेट चाहते रस्त्यावर उतरून फटाके फोडून आणि घोषणाबाजी करून आनंद व्यक्त करत होते. विराट कोहलीसारख्या प्रमुख खेळाडूंचे चाहते अभिनंदन करत होते. राजकीय नेत्यांनीही सोशल मीडियावर टीमचे अभिनंदन केले.