मुंबई प्रतिनिधी :
दि. ०५ जून २०२५
दोन भावांनी बोललं पाहिजे, आम्ही बोलून काहीही फायदा नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी दिली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील युतीच्या प्रश्नावर अमित ठाकरे बोलत होते.
अमित ठाकरे काय म्हणाले?
“माझी भूमिका एवढीच आहे, की तुम्ही जे दोन भाऊ-दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे, आम्ही खाली बोलून काहीही फायदा नाही, मला काहीही इश्यू नाही दोन भाऊ एकत्र येण्यात, पण मी २०१४ आणि २०१७ ला पाहिलं आहे. २०१४-२०१७ सोडा, मी कोव्हिड काळात पाहिलंय, जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते, त्यावेळी राज साहेबांनी उद्धवजींना पहिला फोन केला होता. हा भीषण आजार आलाय आपल्यावर, कुठलंही सरकार असो, आपण त्यांची साथ दिली पाहिजे” असं अमित ठाकरे म्हणाले.
“मी अनेकदा बघितलाय फोन कॉल, मला वाटतं त्यांची इच्छा असेल, त्यांनी फोन करावा. हे मीडिया समोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून अशा युत्या होत नाहीत. मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत. ते बोलू शकतात. ते दोन भाऊ आहेत, बोलतील ना एकत्र” असंही अमित ठाकरे पुढे म्हणाले.
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दिशेने दोन्ही बाजूंनी सकारात्मक पावलं पडताना दिसतायत. जुने वाद विसरुन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात एकी होण्याची चिन्हं व्यक्त केली जातायत. दोनच दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी कुठल्याही पक्षासोबत युती करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. अशातच मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्तेही वाद विसरुन एकत्र येण्याच्या तयारीत आहेत.
सकाळीच ‘एक्स’ सोशल मीडिया हँडलवरुन संदीप देशपांडे यांनी संजय राऊत लिखित ‘नरकातला स्वर्ग’ हे अनुभव कथनपर पुस्तक वाचतानाचा फोटो शेअर केला होता. यावर त्यांनी ‘लपवण्यासारखे काही नाही…’ असे कॅप्शन देत ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत दिले होते.