उमरेड प्रतिनिधी : अनिल पवार
दि. ५ जून २०२५ :
उमरेड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रदीप वरपे यांच्या नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बदलीमुळे उमरेड तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजी आणि असंतोष पसरला आहे. आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी करून नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या वरपे यांच्या बदलीमुळे “असा अधिकारी पुन्हा होणे नाही,” अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
प्रदीप वरपे यांनी उमरेड तहसील कार्यालयात अनेक प्रशंसनीय उपक्रम राबवले. संजय गांधी योजना ऑनलाइन पद्धतीने सुरू करून वयोवृद्धांना सोयीस्कर सेवा प्रदान केली. सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांच्या परवानग्या एक खिडकी योजनेअंतर्गत सहज उपलब्ध करून दिल्या. गावागावात राजस्व शिबिरांचे आयोजन करून हजारो ग्रामस्थांना गावातच विविध दाखले मिळवून दिले. विशेषत: पारधी समाजासाठी पारधी बेड्यावर शिबिरे आयोजित करून त्यांना दाखले मिळवण्यास मदत केली.कोरोना काळात त्यांनी तालुका कंट्रोल रूम एकहाती सांभाळत १२०० परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
शेतकऱ्यांच्या ७/१२ च्या अडचणी सोडवण्याबरोबरच रस्ते आणि पांधन रस्ते मोकळे करून त्यांना दिलासा दिला. विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. PM Kisan, AgriStack आणि ऑनलाइन ७/१२ यासारख्या योजनांद्वारे तहसील कार्यालयाचे कामकाज आधुनिक आणि पारदर्शक केले. तहसील कार्यालयापुरते मर्यादित न राहाता, इतर विभागांशी संबंधित समस्याही त्यांनी सोडवल्या, ज्यामुळे “तहसील कार्यालय म्हणजे वरपे साहेब” अशी धारणा नागरिकांमध्ये निर्माण झाली.वरपे यांच्या बदलीमुळे तालुक्यातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या लोकाभिमुख आणि कार्यक्षम कामगिरीमुळे तहसील कार्यालयाने नवे मानदंड प्रस्थापित केले. अशा अधिकाऱ्याची पोकळी भरून काढणे आव्हानात्मक असेल, असे मत अनेकांनी व्यक्त केले. स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की, भविष्यातही उमरेडला असे कार्यक्षम आणि लोकाभिमुख अधिकारी मिळावेत.