बेंगळुरू प्रतिनिधी :
दि. ०५ जून २०२५
आरसीबीच्या विजयानंतर चिन्नास्वामी स्टेडियम बेंगळुरूमध्ये गोंधळ उडाला. गेट क्रमांक ७ वर प्रचंड गर्दी जमली होती. हे गेट स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध दिशेला आहे. तिथे मोफत तिकिटे मिळतील अशी अफवा पसरली होती. काही मिनिटांतच त्या ठिकाणी लोकांचा तांडा जमला. गोंधळादरम्यान तिथे चेंगराचेंगरी झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) च्या आयपीएल विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. तिकिटे मिळविण्याच्या चढाओढीत लोक एकमेकांवर कोसळले गेले. ज्यामुळे दुर्दैवी घटना घडली.
राजाजीनगर येथील रहिवासी असलेले प्रत्यक्षदर्शी अचिमन्य म्हणाले, “लोकांचा संयम पूर्णपणे सुटला. पोलिसांनी आम्हाला क्यूबन पार्क मार्गे जाण्यास सांगितले, परंतु तोपर्यंत लोकांचा गोंधळ उडाला होता. चेंगराचेंगरी, जखमी आणि मृत्यूच्या बातम्यांमुळे, लोक सैरावैरा धावू लागले.”
सर्वाधिक मृत्यू गेट क्रमांक ७ वर झाले
अफवेनंतर, काही जण रिचमंड सर्कलकडे धावले. तर काही अनिल कुंबळे सर्कलजवळ पोहोचले. बंगळुरूच्या स्टेडियममध्ये २१ स्टँड आणि १३ गेट आहेत. बहुतेक गेट सामान्य लोकांसाठी खुले होते. गेट क्रमांक ९ आणि १० हे केएससीए सदस्यांसाठी राखीव होते. गेट क्रमांक १२, १३ आणि १४ हे सर्वात जास्त गर्दीचे होते. कारण हे गेट संघाच्या बसच्या प्रवेश मार्गावर होते. मोठ्याप्रमाणात चेंगरारी गेट क्रमांक ७ वर झाली.
गर्दी व्यवस्थापनाचा अभाव आणि शहरातील रस्त्यांवर विजयी मिरवणूक काढण्यासाठी परवानगी देण्यात झालेल्या विलंबामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. आरआर नगर येथील ३१ वर्षीय अविनाश एस हा थोडक्यात बचावला. त्याने सांगितले की, एका रुग्णवाहिकेत ४० जखमी लोक होते. मी वेळेवर बाहेर पडलो हे माझे भाग्य होते. पोलिसांनाही गर्दी व्यवस्थापित करण्यात अडचण येत होती.
पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट
२५ वर्षीय सिंचना एन, तिच्या मैत्रिणींसह चिन्नास्वामी स्टेडियममध्ये गेली आणि गर्दीत अडकली. “गेट थोडे उघडताच, सर्वजण पुढे धावू लागले. काचेचा पॅनल तुटला आणि लोक जखमी झाले. मी अनिल कुंबळे सर्कलजवळ होते आणि त्यामुळे मी सर्वात वाईट परिस्थितीतून वाचले. पोलिस फक्त लोकांना धक्काबुक्की करत होते आणि ते गर्दीवर योग्यरित्या नियंत्रण ठेवत नव्हते. संध्याकाळी ५.३० च्या सुमारास पाऊस सुरू झाला तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली,” असे ती म्हणाली.