ठाणे प्रतिनिधी :
दि. ०९ जून २०२५
दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान धावत्या रेल्वे गाडीतून १० ते १२ प्रवासी पडल्याची माहिती समोर आली आहे. फास्ट लोकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे हे प्रवासी खाली पडल्याची प्राथमिक माहिती असून यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच इतर जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
बाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, फास्ट लोकलमधून प्रवास करणारे १० ते १२ प्रवाशांपैकी काही जण रेल्वे ट्रॅकवर आणि काही प्रवासी स्थानकावर पडले. सकाळच्या वेळी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र याबाबत अद्याप रेल्वेकडून अधिकृतरित्या कसलीही माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, पाच प्रवाशांचा जीव घेणाऱ्या या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. रेल्वे प्रशासनाकडून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.