बदलापूर प्रतिनिधी :
दि. ०९ जून २०२५
अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातील काही किराणा दुकाने, बदलापूर शहरातील चहाच्या आणि पानाच्या टपऱ्या ही अमली पदार्थविक्रीची केंद्रे होत चालली आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकांच्या शाखांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या कारवाईत ही बाब उघड झाली आहे. शाळकरी मुले, कॉलेजमध्ये जाणारे तरुण-तरुणी हे या विक्रेत्यांचे मुख्य लक्ष्य असल्याचे दिसून येत आहे. नशेच्या या बाजारावर अंकुश कसा लागणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा बाजार नियंत्रणात येणार कधी असा प्रश्न भेडसावतो आहे.
अंबरनाथ, बदलापूर शहरांमध्ये अमली पदाथांची विक्री आणि पुरवठ्याचे जाळे वेगाने पसरत चालले आहे. परिमंडळ चार अंतर्गत येणाऱ्या अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर शहरात पोलिसांनी गेल्या पाच महिन्यांत केलेल्या कारवाईत जवळपास ५२ किलो गांजा तसेच साडेतीन किलो ड्रग्ज हस्तगत करत विविध कारवाया केल्याची पोलिसांकडे नोंद आहे. तसेच याच आठवड्यात ठाणे, गुन्हे शाखांच्या युनिटने अंबरनाथ तालुका येथून १७ लाखांचे एमडी जप्त केले होते. त्याच्या दोन दिवस अगोदर उल्हासनगर गुन्हे शाखेने अंबरनाथमधून दीड किलो गांजा आणि अमली पदार्थ जप्त केले होते. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर शहरात अमली पदार्थाचे रॅकेट वेगाने पसरताना दिसत आहे. बदलापूर शहरातील चहा आणि पानांच्या टपऱ्यांवरून अमली पदार्थांची विक्री होत असल्याची बाब समोर आली आहे.
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडातील एका ग्रामीण भागातील किराणा दुकानातून पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज हस्तगत केले होते. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी आणि सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी किराणा दुकाने, चहा, पानाच्या टपऱ्यांवरून अमली पदार्थांच्या विक्रीचे रॅकेट चालवले जात आहे.
संध्याकाळनंतर रेल्वेमार्गाचा भाग, बदलापूर, अंबरनाथ येथील तरुणांचे आकर्षण असलेले, नव्याने विकसित करण्यात आलेले रस्ते, ग्रामीण भागातील पावसाळी पर्यटन केंद्र अशा ठिकाणी तरुण-तरुणींना लक्ष्य करीत अमली पदार्थांची विक्री केली जात आहे. त्यात अनेक उच्चशिक्षित आणि सधन कुटुंबातील तरूणही अल्पावधीत अधिक पैसे कमावण्याच्या आमिषाखाली अमली पदार्थांच्या विक्रीत सहभाही होत आहेत. अमली पदार्थांचा या शहरांमध्ये वाढणारा पुरवठा आणि विक्रीमुळे पालक चिंतातुर आहेत.
बदलापूरातील चहा आणि पानांच्या टपऱ्यांवरून अमली पदार्थाची विक्री होत असल्याचा दावा खुद्द सत्ताधारी पक्ष भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी केला आहे. या बाबी आपण निदर्शनास आणून देत पोलिसांना याविरोधात कारवाई करण्यास सांगितल्याचे आमदार कथोरे यांनी एका कार्यक्रमानिमित्त उपस्थित असताना माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
किरकोळ गांजाचे व्यसन आणि विक्री करणाऱ्यांवर स्थानिक पोलिसांकडून नियमित कारवाई होत असली तरी गांजा आणि ड्रग्जच्या मोठ्या साठ्यांवर ठाणे, उल्हासनगर गुन्हे शाखांकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे, उल्हासनगर शाखांच्या पथकांना मिळणारी माहिती स्थानिक पोलिसांच्या यंत्रणांना का मिळत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.