DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

कथा शामल ची…तिच्या अफाट जिद्दीची!

DD News Marathi by DD News Marathi
June 9, 2025
in महाराष्ट्र
0
कथा शामल ची…तिच्या अफाट जिद्दीची!

शामल (लेखिका – वैष्णवी पिंपरीकर, BA, LLB, DCL, Llm)

शामल दिसायला सावळी, पण नाकी-डोळी नीटस, चेहऱ्यावर एक निरागस लाघवीपणा असलेली मुलगी होती. ती एका मध्यमवर्गीय, मराठी कुटुंबात जन्मली. तिचं बालपण एकदम साधं, पण शिस्तबद्ध होतं. पहिले ते दहावीपर्यंतचं शिक्षण तिचं एका मराठी मुलींच्या शाळेत झालं.

वडील सरकारी नोकरीत होते – अत्यंत शिस्तप्रिय, नियमांवर चालणारे. त्यांचं प्रत्येक वाक्य म्हणजे घरातील पूर्वदिशा ठरत असे. घरात काय खायचं, कोण काय करणार, दिवस कसा सुरू होणार – हे सगळं वडिलांच्या मर्जीवर ठरत असे. आईचं काम म्हणजे त्या चौकटीत राहून घर सांभाळणे, मुलांचा अभ्यास बघणे, नवऱ्याच्या इच्छेनुसार वागणे – हेच तिचं जग होतं.

आईचा दिवस पहाटेपासून सुरू व्हायचा. स्वयंपाक, घराची कामं, मुलांचे डबे, कपडे, अभ्यास, सणवार… प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे आणि वेळेत पार पाडायची तिची धावपळ. ती स्वतःला विसरून इतरांसाठी जगायची. संध्याकाळी वडील घरी आले की घरातलं वातावरण अधिकच गंभीर व्हायचं – शांतता, शिस्त आणि नियमांचं एक मूक साम्राज्य.

शामल या सगळ्याला समजून घेत मोठी झाली. तिनं लहानपणापासूनच शिस्त, कष्ट, संयम आणि जबाबदारी या गोष्टी मनात घट्ट रुजवून घेतल्या. तिच्या आयुष्यातली ही सुरुवात जरी साधी वाटत असली, तरी तीच तिचं पुढचं आयुष्य घडवणारी ठरली…

घरात कधीच मन मोकळं करून बोलणं शक्य नव्हतं. एक अनामिक दडपण, एक न सांगता येणारी भीती सतत घरभर पसरलेली असायची. मुलांच्या मनात आणि आईच्या मनातही ती भीती घर करून बसलेली होती. वडील काही बोलले नाहीत, तरी त्यांच्या नजरांनीच वातावरण जड व्हायचं.

शामल आणि तिच्या भावंडांना कायम असं वाटायचं, की आपल्याकडून काही चुकू नये – नाहीतर बाबा रागावतील, घरात वाद होईल. त्यामुळे घरात हसणं, मस्करी करणं, किंवा काही मनातलं बोलणं – हे सगळंच टाळलं जायचं. अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठीही परवानगी लागायची.

आई तर या सगळ्या दबावाखाली पूर्णपणे झुकून गेल्यासारखी वाटायची. ती अत्यंत दक्षतेने, काळजीपूर्वक घरातली प्रत्येक गोष्ट पार पाडायची – एकही चूक न व्हावी म्हणून. तिचा दिवस म्हणजे धावपळ, काम, नियोजन आणि शांतता राखणं… हेच तिचं आयुष्य बनून गेलं होतं. हसणं, गप्पा, विश्रांती – या गोष्टी तिच्या आयुष्यात फारशा उरल्याच नव्हत्या.

शामल लहान असली, तरी तिला हे सगळं जाणवायचं. कधी आईच्या डोळ्यांत थकवा दिसायचा, कधी नकळत तिचं ओठांवरचं हसू हरवलेलं वाटायचं. पण आई मात्र सगळं सहन करत, गिळत, आणि फक्त आपल्या कुटुंबासाठी जगत राहायची.

शामलला दोन बहिणी होत्या. तिघींचं आयुष्य एकाच चौकटीत बांधलेलं – नियमांचं, शिस्तीचं आणि एकप्रकारच्या गूढ शांततेचं. घरातले नियम कटाक्षाने पाळावे लागत. “सातच्या आत घरी या” हा नियम तर अगदी पाळावा लागणारा आदेश होता. शाळा, अभ्यास, वेळेत जेवण, आणि पुन्हा अभ्यास – हाच तिचा दिनक्रम. मैत्रिणी फारशा नव्हत्याच. ओळखीच्या काही मुली असल्या, तरी त्या केवळ शाळेपुरत्या. कुठे जास्त बोलणं, हसणं, घराबाहेर खेळणं किंवा गप्पा – या गोष्टी तिच्या आयुष्यात नव्हत्याच.

शामलच्या मनात अनेकदा प्रश्न येत असत – “दुसऱ्यांच्या घरात एवढं मोकळेपण का असतं?”, “आई कधी विश्रांती घेत नाही का?”, “बाबा इतके कठोर का?”, पण हे प्रश्न तिने कधी कुणाला विचारले नाहीत. विचारायचीही भीती वाटायची.

तिचं आयुष्य बाहेरून पाहायला साधं वाटायचं – शाळा, चांगले गुण, शिस्तीत राहणं. पण तिच्या मनात मात्र हळूहळू एक वेगळा संघर्ष तयार होत होता. तिला वाटायचं, की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे, पण त्याची कल्पनाही ती धड करू शकत नव्हती. आईचा चेहरा पाहून ती अनेकदा गप्पच रहायची.

घरात प्रत्येकाची एक भूमिका होती – बाबा म्हणजे सत्ता, आई म्हणजे निःशब्द कर्तव्य, आणि शामल व तिच्या बहिणी म्हणजे आज्ञाधारक शिष्य. पण या चौकटीतून बाहेर काही जग आहे, हे तिच्या मनात कुठे तरी हलके हलके उमटत होतं…इयत्ता दहावीत गेल्यानंतर शामलच्या आयुष्यात एक वेगळंच, पण अत्यंत धक्कादायक वळण आलं. घरात आधीच बोलायला वाव नव्हता, पण आता वाद, भांडणं आणि आईवर होणारी मारहाण ही नित्याची बाब झाली होती. वडील आता अधिकच कठोर, रागीट झाले होते. आईला केवळ दोष देणं, तिच्यावर आरडा-ओरडा करणं, आणि वेळोवेळी मारहाण करणं – हेच जणू त्यांचं “सामर्थ्य” बनलं होतं.

शामल या सगळ्याचा साक्षीदार होती. पहाटेच्या अन्नसाक्षेपेक्षा, रात्रीच्या अश्रूंची सवय तिला लागली होती. पुस्तकं डोळ्यासमोर उघडी असायची, पण अक्षरं मिटून जायची… अभ्यासात तिचं लक्षच राहत नव्हतं. तिचं मन कोसळत होतं – पण ती कुणालाही सांगू शकत नव्हती, कारण या घरात “मन” असणं म्हणजे नकोच.

तिला कळेनासं झालं – काय बिघडलं आहे? आई इतकं सहन का करते? बाबा इतके बदलले का?

…आणि मग एक दिवस, सगळंच कोसळून पडलं.

बाबांनी दुसरं लग्न केल्याचं समजलं. कोणालाही काही न सांगता, कोणताही विचार न करता त्यांनी दुसरी स्त्री घरी आणली. त्या क्षणी शामलला असं वाटलं की तिचं संपूर्ण जग संपून गेलंय. वडिलांनी केवळ आईला नाकारलं नाही, तर तीन मुलींनाही ——-.

आई नि:शब्द होती – त्या धक्क्याने सैरभैर. तिच्या डोळ्यात आता अश्रूही उरले नव्हते. आणि शामल…? तिच्या आत खोल कुठेतरी काहीतरी तुटून गेलं होतं. तिला वाटत होतं – हे आयुष्यच एक भयंकर स्वप्न आहे.

“आता काय?” – हा प्रश्न तिच्या मनात घोंगावत राहिला.

आईने तिच्या मुलींना सांगितलं की मोठ्यांच्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नका, अभ्यास करा आणि स्वतःच्या पायावर उभं राहा. कारण आता ती फक्त कोणाची बायको नाही – ती एक आई आहे, जी आपल्या मुलींसाठी एक मजबूत आधार आहे. तिचं स्वतःचं अस्तित्व आता फक्त “पत्नी” म्हणून मर्यादित नाही, ती आता “आई” म्हणून अधिक जागरूक, जबाबदार आणि प्रेरणादायी बनली आहे.

शेवटी शाळेतून एक दिवस तिच्या आईला बोलावण्यात आलं.

“तुमच्या मुलीचं वागणं खूप बदललं आहे. ती वर्गात बोलत नाही, अभ्यासात लक्ष देत नाही. तिचं मन कशातच लागत नाही,” असं तिच्या वर्गशिक्षिकेने सांगितलं.

आई शांतपणे ऐकत होती. थोड्याशा थरथरत्या आवाजात तिने सांगितलं, “तिचा वडिलांवर खूप जीव होता. पण काही महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. त्याचा तीवर खूप परिणाम झाला आहे. मी तिला समजावून सांगतेय, पण हे सगळं तिच्यासाठी फार अवघड आहे.”

शिक्षकांनी हळूहळू समजून घेतलं. पण श्यामलाची आई मात्र मनात खूप खचली होती. तिच्या डोळ्यांत फक्त श्यामलाचं दु:ख नव्हतं — स्वतःची असहायता, आणि एक रागही होता… स्वतःवरच.

“मीच कदाचित चूक केली… मीच गप्प राहिले… मीच त्याला दुसरं लग्न करू दिलं… पण मुलीच्या नजरेतून तिचे बाबा हिरावले गेले आणि मी ती रिकामी जागा भरून काढू शकत नाही,” असं ती मनातच म्हणाली.

शेवटी, जरी तिने 75 टक्के गुण मिळवले आणि तिच्या आईला व शाळेला अभिमान वाटला, तरी तिच्या मनातला आनंद किंवा समाधान ठरवता येत नव्हता. हे दाखवतं की केवळ यश मिळवणं पुरेसं नसतं—आयुष्यात अर्थ शोधणं आणि स्वतःच्या संकल्पांना दिशा देणंही तितकंच महत्त्वाचं असतं.शामलला लहानपणापासून पुस्तकांची खूप आवड होती. पुस्तकं तिची मित्र होती, शिक्षक होते, आणि उत्तर शोधण्याचं साधनही. ती वाचायची, लिहायची, कवितांमधून स्वतःचे प्रश्न उमटवायची. शाळेतल्या काव्यवाचन स्पर्धेत तिला मिळालेलं प्रथम पारितोषिक, आणि प्रिन्सिपलने दिलेला सल्ला—”तू तुझ्या आईचा आणि बहिणींचा आधार बन”—या गोष्टी तिच्या मनावर खोलवर कोरल्या गेल्या.

घरातली आर्थिक परिस्थिती पाहता कॉलेजला गेल्यावर शामलने ठाम निश्चय केला—वडिलांकडून एक रुपयाही घ्यायचा नाही. तिने छोट्या-मोठ्या कामांपासून सुरुवात केली. जे मिळेल ते काम करत राहिली—सोबतच कॉलेजला जायची, शिकवण्या घ्यायची, अभ्यास करायचा. स्वतःचं शिक्षण सांभाळून दोन्ही बहिणींनाही अभ्यासात मदत करत राहिली.

तिच्या मेहनतीचं फळ मिळालं—तिने टी.वाय. बी.ए. पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पण यशातही ती विनम्र राहिली. कारण तिचं ध्येय केवळ स्वतःसाठी नव्हतं, तर तिच्या कुटुंबासाठीही होतं. शामलचं आयुष्य कॉलेज, नोकरी आणि अभ्यासाच्या त्रिकोणात फिरत होतं. पण त्या त्रिकोणाच्या बाहेरही एक वेगळी, अधिक कठीण लढाई ती रोज लढत होती — घराबाहेरील अडचणींपेक्षा घरामधील विषमतेशी.

शामलच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं. दुसरी आई मात्र त्यांच्या आयुष्यात एक वादळासारखी आली. तिला शामल आणि तिच्या बहिणींचं काहीच सोयरसुतक नव्हतं. ती सतत त्यांच्या विरोधात बोलायची, वडिलांच्या कानांमध्ये विष ओतायची.

घरात वादविवाद, चिडचिड, आणि दुजाभाव रोजचाच झाला होता. दुसऱ्या आईपासून एक भाऊ झाला होता. त्याच्यावर मात्र सर्वांची माया, प्रेम, होते. त्याला काहीही न सांगता मिळायचं – कपडे, शालेय वस्तू, खेळणी. पण शामल आणि तिच्या बहिणींना प्रत्येक गोष्टीसाठी काटकसर करावी लागायची – जुने दप्तर, रिप केलेले शूज, आणि रात्र रात्र अभ्यास.

या सगळ्या अडचणींमध्येही त्यांना एकच आधार होता – त्यांची आई.

शामलची आई – एक साधी, पण विलक्षण खंबीर स्त्री. दुसऱ्या बायकोचं वागणं सहन करत, पतीचं दुर्लक्ष झेलत, आणि तीन मुलींना एकत्र बांधून ठेवणारी. ती रोज त्यांना शिकवत असे, “बाळांनो, परिस्थिती काहीही असो, पण शिकून मोठं व्हा. शिक्षणच तुमचं खरी संपत्ती आहे.”

शामल ती लढाई फक्त स्वतःसाठी लढत नव्हती – ती आईसाठी लढत होती, बहिणींसाठी लढत होती, आणि त्या घरातल्या न्यायासाठी लढत होती. ती प्रत्येक अपमान, प्रत्येक दुजाभाव, आणि प्रत्येक कटकारस्थान एक आव्हान म्हणून स्वीकारत होती.

शामल आणि तिच्या भावंडांसाठी “चुकणे” म्हणजे संकटाचं दार उघडणं. त्यांच्या चेहऱ्यावर सतत भीती आणि काळजीचं सावट असायचं. लहान मुलांच्या निरागस मोकळेपणाला जणू कुलूप लावलेलं होतं. काही विचारायचं, काही मागायचं – या गोष्टीसुद्धा ‘धाडस’ ठरत.

आणि त्या सगळ्याच्या मध्यभागी होती आई – एक शांत, स्थिर आणि निरंतर झिजणारी स्त्री.

तिचं आयुष्य म्हणजे एक अखंड संयमाचं व्रत.

शामलची अवस्था म्हणजे जणू एखाद्या बंद खोलीत गुदमरून श्वास घेणं. ती मोठी होत होती, समजूतदार होत होती – पण तिचं मन घराच्या वातावरणात अडकून पडलं होतं.

“हे असंच असायला हवं का?”

हा प्रश्न तिच्या मनात पहिल्यांदाच स्पष्ट उमटू लागला होता.

आईच्या चेहऱ्यावरचा थकवा, भावंडांच्या चेहऱ्यावरचं सततचं जपून वागणं, आणि वडिलांचं अव्यक्त अधिकारशाही – या सगळ्याला आता तिनं बघायचं थांबवलं नव्हतं, पण समजून घ्यायला सुरुवात केली होती.

एक दिवस ती आणि तिची धाकटी बहीण खोलीत अभ्यास करत होत्या. चुकून बहिणीच्या हातून पाणी सांडलं. ती घाबरून जायला लागली, डोळ्यांत अश्रू तरळले – कारण तिला वाटलं की बाबा पाहतील, ओरडतील. शामलनं तिला हलकेच बिलगवलं आणि तिला शांत केलं. त्या क्षणी तिच्या मनात काहीतरी ठाम ठसटलं…

हे घर असं भीतीवर चालणारं नकोय.त्या रात्री तिनं पुन्हा डायरी उघडली.

तिनं लिहिलं – “बाबांची नजर हुकूम आहे, आणि आईचं मौन – एक न संपणारी शिक्षा.हे सगळं सहन करणं म्हणजे शिस्त नाही, ही एक कैद आहे.”पुढच्या काही दिवसांत तिनं एका मराठी युवक साहित्य संमेलनात भाग घेतला. विषय होता –मौन – व्यक्त होणं की दडपण?”शामलचा निबंध जणू तिच्या घराच्या भिंतींना लिहिलेला होता.

तिनं लिहिलं –

“घर म्हणजे निवारा असतो, पण तो जर भीतीनं भरलेला असेल, तर तो तुरुंग होतो.

मौन जर स्वेच्छेचं असेल, तर तो शांतता ठरतो; पण जर तो लादलेला असेल,तर तो अंतर्मनाचा टोकाचा हल्ला असतो.शामलचा लेख वाचून अनेकांनी तिला थांबवून विचारलं – “ही गोष्ट खरी आहे का?”

तिच्या डोळ्यांत पाणी आलं. ती फक्त हसली.

ती उत्तर देत नव्हती, पण तिचे शब्द सर्वकाही बोलून गेले होते.

त्या दिवशी तिला जाणवलं –

“मी जे बोलू शकत नाही, ते मी लिहू शकते. आणि हे लिहिणं फक्त माझं नाही – माझ्या आईसारख्या असंख्य स्त्रियांचंही आहे.”एलएलबी पूर्ण झाल्यावर, शामलने वकिलीची जबाबदारी उचलली. न्यायाच्या मार्गावर ती निघाली, कुणाच्याही आवाजाला दबू न देता. सुरुवातीला तिला अनेक अडचणी आल्या – कोर्टात वरिष्ठ वकिलांकडून दुर्लक्ष, महिला वकिलांबाबत असलेली संशयाची नजर, आणि आर्थिक मर्यादा. पण शामल जिथे उभी राहिली, तिथे तिने कानूनी चौकट आणि नैतिक ठामपणा यात समतोल राखला.

तिने दोन्ही बहिणींची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या शिक्षणात मदत केली, लग्नासाठी मार्गदर्शन केलं, आणि स्वतःच्या हाताने दोघींचं लग्न लावलं. आई आता तिच्यामुळे खंबीर उभी राहू लागली होती. आयुष्यात स्थैर्य येत होतं, पण समाज आणि घराचे प्रश्न अद्यापही बाकी होते.

शामलच्या लग्नाची चर्चा सुरू झाली, पण पुन्हा तिची दुसरी आई आडवी आली. तिच्या निर्णयांत अडथळा आणणं, तिला दबावाखाली आणणं – हे रोजचंच होतं. पण यावेळी शामल मागे हटणारी नव्हती. “आपल्या शिक्षणाला, विचारांना आणि व्यक्तिमत्त्वाला समजून घेणारा जोडीदार नसेल, तर लग्नच नको!” – हे तिचं ठाम मत होतं.

तिने वधुवर सूचक मंडळात नाव नोंदवलं. वडिलांचा व दुसऱ्या आईचा तीव्र विरोध झाला. पण यावेळी शामल एकटी नव्हती – तिच्या सोबत होती तिची आई, आणि तिची स्वतःची ‘जागृत’ ओळख.

शेवटी, एक दिवस तिच्या आयुष्यात असा जोडीदार आला – जो तिच्या विचारांचा, तिच्या स्वाभिमानाचा, आणि तिच्या स्वप्नांचा खरा साथीदार ठरला. लग्न झालं. वडिलांचा विरोध कायम राहिला, पण शामलला आता मागे वळून पाहण्याचं काहीच कारण नव्हतं.

तिच्या नवऱ्याने तिच्या कुटुंबालाही आपलंसं मानलं. तिच्या आईला, बहिणींना सन्मान दिला.

लग्नानंतरही शामलने शिक्षण थांबवलं नाही. तिने DCL (Diploma in Cyber Law) केला. आज ती एक प्रसिद्ध वकील आहे. गरिब, अत्याचारग्रस्त, हक्कांपासून वंचित महिलांसाठी ती एक सशक्त आवाज ठरते. तिच्या वकिलीच्या खोलीत नुसते फाईल्स नसतात – त्या प्रत्येकात एका दुःखद कहाणीचं न्यायात रूपांतर असतं

समारोप – एक विचार

आजही शामल विचार करते — “स्त्री-पुरुष समानता” हा कायद्यातला मुद्दा आहे, पण समाजाच्या मनात तो केव्हा रुजणार?

काय फक्त कायद्याची भाषा पुरेशी आहे? की आपल्या घराघरात बदल घडणे गरजेचे आहेत?

शामलची लढाई वैयक्तिक नव्हती – ती सामाजिकही होती. तिचं आयुष्य हेच एक जणू याचिका होती – ‘सन्मानासाठी, समानतेसाठी, आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी.’

 

  • अॅड. वैष्णवी पिंपरीकर

 

 

 

 

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

बदलापूर, अंबरनाथमध्ये चहा, पान टपऱ्यांवर ड्रग्जची राजरोस विक्री!

Next Post

जननायक बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त माल्यार्पण व अभिवादन कार्यक्रम!

Next Post
जननायक बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त माल्यार्पण व अभिवादन कार्यक्रम!

जननायक बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त माल्यार्पण व अभिवादन कार्यक्रम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गारपीरवाडी चौधरवाडी भागांमध्ये बिबट्याच्या वावर!

गारपीरवाडी चौधरवाडी भागांमध्ये बिबट्याच्या वावर!

June 16, 2025
‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

June 16, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

June 14, 2025
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

June 14, 2025
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

June 14, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.