मुंबई प्रतिनिधी :
दि. १३ जून २०२५
अहमदाबादमधील विमान अपघातामागे पक्ष्याची धडक की तांत्रिक व अन्य काही कारण आहे, याबाबत तपास सुरू आहे. एअर इंडियाचे विशेष पथक गुरुवारी संध्याकाळी अहमदाबादला पोहोचले आहे. ब्लॅक बॉक्समधून मिळालेल्या माहितीच्या आधारेच तांत्रिक माहिती समोर येईल. तोपर्यंत चर्चांना अर्थ नाही, असे विमान वाहतूक तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
एखाद्या विमानाचा अपघात कसा झाला, याच्या अनेक शक्यता असतात. मात्र, सुरुवातीच्या व्हिडिओवरून कोणताही तर्क काढता येणार नाही, त्यामुळे कॉकपीट व्हाइस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर यावरून जी माहिती उपलब्ध होईल त्यावर अवलंबून राहावे लागेल, असे निवृत्त हवाईदल अधिकारी आणि विमान वाहतूक तज्ज्ञ विंग कमांडर अभिजीत गोखले यांनी सांगितले. सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये विमान एका ठरावीक उंचीला पोहोचल्याचे दिसत आहे. यामध्ये इंजिनमध्ये पुरेशी क्षमता नव्हती का, असा प्रश्न निर्माण होतो. मात्र यासाठी नेमके काय कारण आहे हे कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डरच्या माहिती विश्लेषणावरूनच कळेल. विमान उड्डाण घेताना एका इंजिनवर उडू शकते. वैमानिकांना दर सहा महिन्यांनी अशा पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे यासंदर्भात प्रश्न आत्ता उपस्थित केले जाऊ नयेत असेही ते म्हणाले. या विमानतळाच्या बाहेर थेट वस्ती होती. तिथे मोकळे मैदान असते किंवा पाणी असते तर लॅंडिंग करता येण्याची शक्यता असू शकते. मात्र, बिघाड कुठे झाला हे कळल्याशिवाय चर्चा करणे शक्य नसल्याचे ते म्हणाले.
अहमदाबादच्या आसपास पक्ष्यांचा वावर असल्याच्या सूचना वैमानिकांना देण्यात येतात, याकडेही या घटनेच्या निमित्ताने लक्ष वेधण्यात येत आहे. या घटनेमध्ये इंजिनमध्ये पक्षी अडकला होता का याचीही तपासणी करण्यात येईल. पक्षी अडकल्यास इंजिनाची कार्यपद्धती बदलेल असेही गोखले यांनी सांगितले. मात्र या सर्व चर्चा असून अधिकृत माहिती आल्याशिवाय कोणतेही निष्कर्ष काढले जाऊ नयेत असे आवाहन त्यांनी केले. सर्वसाधारणपणे विमानतळ ऑपरेटरकडून परिसरात पक्षी येऊ नयेत यासाठी उपाययोजना केल्या जातात. विमानतळ परिसरामध्ये कचऱ्याचे ढीग होऊ नयेत माचीही काळजी घेण्याचे आवाहन केले जाते. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे ही समस्याही वाढल्याचे विमान वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विमानाच्या धावपट्टीच्या पुढे असलेल्या सेफ्टी फनेलची जागा पुरेशी होती का याचाही यामुळे विचार केला जाईल याकडेही काही तज्ज लक्ष वेधत आहेत.
अपघातग्रस्त विमान ११ वर्षे जुने असल्याने त्यासंदर्भातही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र योग्य काळजी घेतल्यास विमाने ४० वर्षांपर्यंत व्यवस्थित चालतात, असे हवाई वाहतूक तज्ज्ञ मंदार भारदे यांनी सांगितले. जगभरामध्ये जुनी विमाने अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या विमानाच्या देखभालीमध्ये उणीव होती का हेही कळेल, असे ते म्हणाले.
विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी ब्रिटनची संस्थाही मदत करणार आहे. ब्रिटनच्या ‘एअर अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्रांच ने (एएआयबी) भारतीय तपास संस्थेशी संपर्क करून मदतीची तयारी दर्शवली आहे. दुसरीकडे भारताच्या ‘एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो’ चे महासंचालक आणि संचालक घटनास्थळी रवाना झाले आहेत. ही संस्था नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारित काम करते. भारतीय हवाईक्षेत्रात दुर्घटनांचा तपास ही संस्था करते. दुर्घटना बाबत सखोल तपास करून सुरक्षेमध्ये सुधारणा करण्यासाठी ही संस्था उपाययोजना सुचवते.
ब्लॅक बॉक्सचा शोध सुरु
विमान हवेत झेपावल्यानंतर लगेचच वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (एटीसी) आपत्कालीन परिस्थितीची कल्पना दिली. मात्र, एटीसीने त्यास प्रतिसाद देण्यापूर्वीच विमान जमिनीवर कोसळले. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.