अहमदाबाद प्रतिनिधी :
दि. १३जून २०२५
गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या विमानात २४२ जण होते. यापैकी १२ कर्मचारी होते. या अपघातातून एक जण जिवंत बचावला आहे. ११ ए आसन क्रमांकावर बसलेले प्रवासी रमेश विश्वकुमार या अपघातातून चमत्कारिकपणे बचावले. विमान अपघातातून ते अगदी थोडक्यात बचावले. अपघाताची तीव्रता पाहता बहुतांश जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
भूमी चौहान नावाची तरुणी या अपघातातून अगदी थोडक्यात बचावली. विमान पकडण्यास उशीर झाल्यानं तिचा जीव वाचला. अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यास भूमीला उशीर झाला. वाहतूक कोंडीमुळे ती विमानतळावर १० मिनिटं उशिरा पोहोचली. उशीर झाल्यानं तिला विमान पकडता आलं नाही. तिला बोर्डिंगची परवानगी देण्यात आली नाही.
एअर इंडियाच्या विमानाचा उड्डाणानंतर अवघ्या सहा मिनिटांत अपघात झाला. विमान ४०० फूट उंचीवरुन अचानक खाली आलं. पायलटला परिस्थिती हाताळण्यासाठी केवळ १ मिनिट मिळालं. इतक्या कमी वेळात अपघात टाळणं निव्वळ अशक्य होतं. अपघाताची माहिती मिळताच भूमी चौहान थरथर कापू लागली. तिचा अक्षरश: थरकाप उडाला. बराच वेळ ती मानसिक धक्क्यात होती.
भूमी चौहाननं स्वत:ला सावरत तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. ‘मला केवळ १० मिनिटं उशीर झाला. त्यामुळे मला फ्लाईट पकडता आली नाही. विमान पकडता न आल्यानं दु:खी मनानं विमानतळावरुन परतत असताना मला अपघाताबद्दल समजलं. त्यावेळी मी एक्झिट गेटला होते. काही मिनिटांमुळे मिस झालेल्या विमानाचा अपघात झाल्याचं त्यावेळी मला समजलं,’ असं भूमी चौहाननं सांगितलं.
अपघाताबद्दल समजताच भूमी काही वेळ सुन्न झाली. त्यानंतर ती घरी परतली. भूमी लंडनमध्ये पतीसोबत राहते. आज ती पतीकडे परतणार होती. सुट्टी घालवण्यासाठी ती भारतात आली होती. विमानतळावर उशिरा पोहोचल्यानं तिचा जीव वाचला. माझ्या गणपती बाप्पानं मला वाचवल्याच्या भावना तिनं व्यक्त केल्या. भूमी दोन वर्षांपूर्वी लंडनला गेली होती. त्यानंतर ती पहिल्यांदाच भारतात आली होती.