माळेगाव प्रतिनिधी : राहुल चव्हाण
दि. १३ जून २०२५
माळेगाव (ता. बारामती) कारखाना निवडणूकीला सामोरे जाण्यासाठी मनपसंत चिन्ह मिळण्यासाठी उमेदवारांची आज बारामती निवडणूक कार्यालयात चांगलीच रस्सीखेच झाली. निळकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार नितीन सातव हे पहाटे पासूनच चिन्ह मिळवण्यासाठी रांगेत प्रथमदर्शनी उभे होते. विरोधी गटाचे प्रमुख रंजन तावरे नंतरच्या कालावधीत आले आणि त्यांनी रांग सोडून कार्यालयात प्रवेश केला. त्यावर अक्षेप घेत सातव यांच्यासह रांगेतील उमेदवारांनी तावरे यांना प्रवेशासाठी विरोध केला.याप्रसंगी दोन्ही गटात प्रचंड आरडाओरड आणि बाचाबाची झाली. हा गोंधळ आवारण्यासाठी पोलिसांचा हस्तक्षेप झाला. निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी सीसीटीव्ही फुटेचा आधार घेत प्रथम येणारे सातव यांच्या निळकंठेश्वर पॅनेलला कपबशी हे चिन्ह दिले, तर तावरेंच्या सहकार बचाव शेतकरी पॅनेलला किटली चिन्ह दिले. तर बळीराजा पॅनेलला तुतारी हे चिन्ह मिळाले.
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर २१ जागांसाठी ९० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यानुसार आज बारामती निवडणूक कार्यालयात अधिकारी यशवंत माने यांच्या अधिपत्याखाली चिन्ह वाटप कार्यक्रम पार पडला. सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेला चिन्ह वाटप कार्यक्रम पूर्णतः गोंधळात पार पडला. नितीन सावंत यांनी कपबशी चिन्ह मिळण्यासाठी निवडणूक कार्यालयात पहाटे १ वाजताच उपस्थित राहून रांगेची प्रथम सुरूवात केली. चिन्ह मिळवण्यासाठी प्रथम येणाऱ्यास नियमानुसार प्रशासनाकडून प्राधान्य दिले जाते. त्यानुसार कपबशीचा दावा सातव यांनी केला होता. त्याच वेळी विरोधी गटाचे रंजन तावरे यांनी निवडणूक कार्यालयात प्रवेश केला व त्या प्रक्रियेविरुद्ध आवाज उठविला.
यावेळी निळकंठेश्वर पॅनेलचे समर्थक स्वप्नील जगताप, विजय तावरे, किरण तावरे, शिवराज जाधवराव, प्रताप आटोळे, डी.डी. जगताप आदी कार्यकर्ते विरुद्ध विरोधक रंजन तावरे, युवराज तावरे, अजिंक्य तावरे आदींमध्ये बाचाबाची व आरडाओरड झाली.
हा प्रसंग आवरताना अक्षरशः पोलिसांची दमछाक झाली. उपविभागिय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांना घटनास्थळी यावे लागले. त्याचवेळी निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत प्रथम येणाऱ्या उमेदवारांना मागणीनुसार चिन्ह दिले जाईल, असे जाहीर केले. मग त्या वादावर पडदा पडला.
प्रचारासाठी तारेवरची कसरत
माळेगाव कारखाना निवडणूकीत ‘छत्रपती’चा तडजोडीचा पॅटर्न वापरला जाणार की दुरंगी लढत होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु प्रत्यक्षात माळेगावच्या निवडणूकीत चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मतदान कार्यक्रमात माघार घेण्यासाठी तब्बल १५ दिवस दिले होते, परंतु प्रचारासाठी आता आठ दिवसच मिळाले आहेत. परिणामी निळकंठेश्वर, सहकार बचाव, बळीराजा आणि कष्टकरी शेतकरी पॅनेलच्या उमेदवारांना प्रचारासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.