सांगली प्रतिनिधी :
दि. १३ जून
देशप्रेम केवळ १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवशी सोशल मीडियावर तुफान व्यक्त केलं जात असल्याचं चित्र असतं. अतिरेकी हल्ले, देशविरोधी कारवाई, यात शहीद होणारे सैनिक यांची आपल्याला काही दिवसच आठवण राहाते. काही दिवस सोशल मीडियावरील चर्चेनंतर मात्र याचा सर्वांनाच विसर पडतो. पण, आपल्या देशात असं एक गाव आहे जे गेल्या आठ वर्षांपासून न चुकता दररोज पहाटे राष्ट्रगीत स्पीकरवर लावून देशाप्रति, सैनिकांप्रती मानवंदना देतं.
भिलवडी गावाचा अनोखा आदर्श
सांगली जिल्ह्याच्या कृष्णा काठावर असलेलं आणि दहा हजारहून अधिक लोकवस्ती असलेल्या टुमदार भिलवडी गावाने अनोखा आदर्श देशासमोर ठेवला आहे. प्रबळ इच्छाशक्ती, दृढनिश्चय आणि दृढ संकल्प असेल तर प्रत्येक प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. असंच काहीसं भिलवडी गावच्या गावकऱ्यांनी केलं आहे.
गावातील व्यापारी संघटनेने सुरू केलेली राष्ट्रगीताची परंपरा २०२० पासून अखंडितपणे सुरु आहे. रोज सकाळी बाजाराची, गावातील व्यापाराची सुरुवात होण्याआधी दिनविशेष, त्यावर आधारित एक प्रेरणादायी गाणं आणि घडाळ्यात ९ वाजून १० मिनिटांनी राष्ट्रगीत लावलं जातं. व्यापारी संघटनेच्या पब्लिक ऍड्रेस सिस्टिमवरुन हे राष्ट्रगीत लावलं जातं आणि त्याचा सर्व व्यापारी, ग्रामस्थ मान राखतात. राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर सर्वजण स्तब्ध उभे राहतात. सांगली जिल्ह्यातल्या भिलवडीच्या व्यापाऱ्यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे.
९ वाजून १० मिनिटांनी सायरन वाजतो
सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी सायरन वाजतो, त्यानंतर एक ते दोन देशभक्ती पर गीतं, त्यानंतर दिनविशेष सांगून पब्लिक अॅड्रेस सिस्टीममधून राष्ट्रगीत वाजतं. लोक थांबतात, राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर स्तब्ध उभे राहतात. राष्ट्रगीत संपल्यानंतरच व्यापारी आपली दुकानं सुरू करतात. नवख्या व्यक्तीसाठी हे आश्चर्यचकित होण्यासारखंच होतं. राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान या गावात सुरू होत नाही.
१५ ऑगस्ट २०२० पासून भिलवडी मध्ये PA प्रणालीद्वारे ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत दररोज वाजवण्यास सुरुवात केली तेव्हा काहींना वाटलं की देशभक्तीचा उत्साह काही दिवसांत किंवा आठवड्यातून कमी होईल. मात्र, सर्व निष्कर्ष खोटे ठरले. दहा हजार लोकसंख्या असलेल्या छोट्या शहरातील नागरिकांमध्ये देशभक्तीचा उत्साह कायम आहे. सतत प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रगीत वाजवण्याची ही संकल्पना या गावातील काही व्यापाऱ्यांनी सुरू केली.
सकाळी ९ वाजता सायरन वाजल्यानंतर, ५२ सेकंदांसाठी राष्ट्रगीत वाजवलं जातं, जे गावात सर्वत्र स्पीकर वरुन ऐकवलं जातं. ऑडिओ सुरू होताच, अगदी छोट्या गल्ल्या आणि रस्त्यांवरील नागरिक राष्ट्रगीतासाठी उभे राहातात. गावातून जाणारा मार्गही अशाच प्रकारचा साक्षीदार आहे. जेव्हा राष्ट्रगीत सुरू होतं, तेव्हा वाहतूक ठप्प होते आणि विविध वाहनांतील नागरिक राष्ट्रगीतासाठी खाली उतरतात. ही संकल्पना यशस्वी करण्याचं श्रेय इथल्या लोकांना जातं, ज्यांनी केवळ पुढाकार घेतला आणि २०२० पासून देशभक्तीची भावना देखील यशस्वी करून दाखवली.
असे बरेच लोक असतील जे वर्षातून फक्त दोनदा २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला राष्ट्रगीताला उभे राहात असतील. त्याशिवाय चित्रपटगृहात चित्रपट पाहताना राष्ट्रगीताला मान देऊन उभे राहणारे लोक आहेत. पण त्यामागे फक्त कायद्याचा धाक असेल. मात्र महाराष्ट्रातील या छोट्याशा गावाने सकारात्मक संदेश दिला आहे.
सांगलीतील या गावाआधी देशातील इतर काही शहरांमध्येही सकाळी राष्ट्रगीत वाजवण्याची प्रथा सुरू करण्यात आली होती. मात्र दुर्दैवाने ही प्रथा फार काळ टिकू शकली नाही आणि कालांतराने बंद झाली. मात्र सांगलीतील या भिलवडी गावात २०२० पासून आतापर्यंत ही राष्ट्रगीत वाजवण्याची प्रथा आजही कायम आहे. त्यामुळेच सांगलीतील भिलवडी गाव देशातील अशाप्रकारे प्रथा असणारं आणि टिकवून ठेवणारं भारतातील पहिलंच गाव ठरलं आहे.