जळगाव प्रतिनिधी :
दि. १४ जून २०२५
गेल्या दोन दिवसापासून जळगाव जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने आगमन केले आहे. अनेक ठिकाणी अपघात होऊन काही जणांना आपले प्राण गमवावे लागले. अशातच जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. घरात कपडे वाळवण्यासाठी बांधलेल्या तारेमध्ये वीज प्रवाह उतरल्याने वडील आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील तासखेडा इथे ही घटना घडल्याचे समोर आले आहे. समाधान कोळी आणि मानवी कोळी असं मृत्यू झालेल्या पिता-पुत्रीचं नाव आहे. या घटनेमुळे कोळी कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहेत.
पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे घरात कपडे वाळत घालण्यासाठी कोळी कुटुंबीयांनी तार बांधली होती. या तारेमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. पण याबद्दल कुणालाच कल्पना नव्हती. समाधान कोळी यांचे वडील अशोक कोळी हे तारेवरून रुमाल काढण्यासाठी गेले असता विजेचा धक्का बसून ते फेकले गेले आणि तार तुटली. याच तुटलेल्या तारेला स्पर्श झाल्याने समाधान कोळी यांना विजेचा जोरदार झटका लागला. यावेळी घरात खेळत असलेली त्यांची मुलगी मानवी हिनेही वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. बाबांची तडफड पाहून अनवधानाने त्यांना स्पर्श करण्यास गेलेल्या मानवी हिलाही विजेचा जोरदार धक्का लागला.
विजेचा जबर धक्का लागल्यामुळे दोघांनीही जागीच प्राण सोडले होते. मात्र त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. परंतु दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. बाप लेकीला विजेच्या धक्क्यामुळे मरण आल्यामुळे सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कोयना धरण परिसरात तुफान पाऊस, शिंदेंचा ताफा थांबला, अखेर बोटीने दरे गावापर्यंत प्रवास!
जळगावात पावसाचा कहर
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मागील सहा महिन्यांतील एप्रिल, मे व जून महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळासह झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल २७ हजार ६६१ शेतकऱ्यांच्या १५ हजार ४११ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नुकत्याच बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने देखील ४ हजार हेक्टरवरील फळ पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.