अहमदाबाद प्रतिनिधी :
दि. १४ जून २०२५
विमान अचानक कोसळलं. या अपघातात तब्बल 241 प्रवासी ठार झाले आहेत. मात्र या अपघातात अकोल्यााची ऐश्वर्या तोष्णीवाल मात्र थोडक्यात बचावली. मेघानीनगरमध्ये ज्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर विमान कोसळले त्या कॉलेजात ऐश्वर्या द्वितीय वर्षात शिकत आहे. यावेळी नेमकं काय घडलं, या दुर्घटनेतून ऐश्वर्या नेमकी कशी वाचली?
ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा ऐश्वर्या होस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर झोपलेली होती. त्याचवेळी अचानक कशाचा तरी मोठा आवाज झाला आणि सगळीकडे धुरच धूर दिसू लागला. सगळीकडे आरडाओरडा सुरू झाला होता. काय झालं तेच काही कळत नव्हतं. अशाही परिस्थितीत ऐश्वर्याने न घाबरता धुराच्या लोटांतून वाट काढत स्वतःचा जीव वाचवला.
ऐश्वर्या तोष्णीवाल सध्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज अहमदाबाद येथे डीएम अँकोपॅथोलॉजीच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. घटना घडण्याच्या एक दिवस आधीच ती आजोबांचा वाढदिवस साजरा करून परतली होती. ज्यावेळी हा अपघात घडला तेव्ही ती झोपेत होती. परंतु, मोठ्या आवाजाने तिला जाग आली. डोळे उघडून पाहिलं तर सगळीकडे धुरच धूर दिसत होता. परिस्थिती पाहून तिनं स्वतःला एका चादरीत गुंडाळून घेतलं. धुराच्या लोटातून वाट काढत पाचव्या मजल्यावरून खाली उतरत जीव वाचवला. या धावपळीत तिच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर भाजल्याच्या खुणा आल्या.
या घटनेनंतर ऐश्वर्या घाबरली होती. तशाच स्थितीत तिने वडील अमोल तोष्णीवाल यांना फोन केला. त्यांना देखील भीती वाटली. त्यांनी दुकान बंद केलं आणि घर गाठलं. टिव्ही सुरू केला. टिव्हीवर याच बातम्या सुरू होत्या. देवाच्या कृपेने आमची मुलगी एवढ्या मोठ्या अपघातातून वाचली अशी प्रतिक्रिया वडिलांनी दिली. या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
मृतांच्या कुटुंबियांना एक कोटींची मदत
गुजरातच्या अहमदाबाद येथील मेघानी नगर परिसरात १२ जून गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले असून या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचा दावा असोसिएडेट प्रेस या संस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने केला आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना टाटा ग्रुपकडून प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.