पुणे प्रतिनिधी :
दि. २० जून २०२५
पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पानशेत येथे सिगारेट ओढताना हटकल्याने काही पर्यटकांनी एका स्थानिक तरुणाची हत्या केली. आरोपींनी तरुणाच्या छातीवर दगड मारून त्याला संपवले. पोलिसांनी या प्रकरणी १२ तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे.
रोहिदास काळुराम काटकर (वय २४) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो कादवे, ता. वेल्हे येथील रहिवासी होता. या प्रकरणी पोलिसांनी आकाश सुभाष भिसे (वय २१), भागवत मुंजाजी आसुरी (वय २०), रितेश उत्तम जोगदंड (वय २१), उमेश उर्फ भैय्या रामभाऊ शेळके (वय २१) आणि पांडुरंग भानुदास सोनवणे (वय १९) यांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी मूळचे परभणी जिल्ह्यातील असून सध्या ते पुण्यातील नऱ्हे भागात राहतात. ही घटना १५ जून रोजी पानशेत परिसरात घडली.
ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, “आरोपी 15 जून रोजी पानशेत धरणाकडे फिरायला आले होते. सायंकाळी सात वाजता पुण्याकडे परतताना ते एका हॉटेलसमोर सिगारेट ओढण्यासाठी थांबले. यावेळी रोहिदास काटकर याने त्यांना हटकल्याने वाद झाला. या वादातून आरोपींनी रोहिदास याला बेदम मारहाण करत त्याच्या छातीवर जोरात दगड मारला. त्यामुळे रोहिदास याचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपी हे काळ्या रंगाच्या मोपेड आणि मोटारसायकलवरून पुण्याच्या दिशेने पळून गेले.
पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. आरोपींची वाहने पुण्यातील नऱ्हेच्या वाल्हेकर चौकात सापडली. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता दुचाकी मालकाने आकाश भिसेला वाहन दिल्याचे सांगितले. पोलिसांनी आकाश भिसेला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला. त्याने आपल्या साथीदारांची नावे उघड केली असून पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.
दरम्यान, उपनिरीक्षक अमित देशमुख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पानशेत परिसरात या घटनेची चर्चा असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.