मुंबई प्रतिनिधी :
दि. २५ जून २०२५
राज्याच्या राजकारणात सध्या काळी विद्या आणि काळी जादू यावरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं आहे. भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या आरोपाला रामदासभाई कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे सेनेकडून यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री भरत गोगावले यांच्यावरही अशा स्वरूपाचे आरोप झाले आहेत. आता या सगळ्याला रामदास कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर देत थेट उद्धव ठाकरे यांनाच लक्ष केलं आहे. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांना अटक होऊ नये म्हणून हैद्राबादवरून एक मांत्रिक आणला गेला असा खळबळजळक आरोप रामदासभाई कदम यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केल्याने खळबळ उडाली आहे.
या मांत्रिकाला दोन दिवस मातोश्रीवर ठेवला, त्यानंतर पाच दिवस खोपोलीत त्यांचं जे राहण्याचे ठिकाण आहे तिथं पाच दिवस ठेवला आणि तिथे बसून आदित्य यांना अटक होऊ नये म्हणून तांत्रिक विद्या केली हे खरं आहे की खोटं आहे असा सवाल त्यांनी केला. या तांत्रिकाला शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांचा मुंबईतील एक खासदार घेऊन आला असा दावा करत ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे एकदा उद्धव ठाकरे यांना विचारून घ्या अशा शब्दात ठाकरे यांच्यावर रामदास कदम यांनी टीका केली आहे. आणि मी त्याचे फोटो देईन मी त्याचं नाव देईन मी पुराव्यासकट बोलतो असाही मोठा दावा रामदासभाई कदम यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केलंय. मी पुराव्यासकट बोलतो बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल हे आम्हाला माहिती आहे. आम्ही भास्कर जाधव यांच्यासारखी हवेत तलवार कधीही चालवत नाही. ज्याला कावीळ झालेली असते त्याला सारे जग पिवळे दिसतं, असंही रामदास कदम म्हणाले.
दरम्यान ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्या बोलण्याला आपण फार किंमत देत नाही. त्यामुळे त्यांचं बोलणं गांभीर्याने घेण्याची गरज नाही अशा शब्दात उत्तर देत रामदास कदम यांनी केलेली दावे फेटाळले आहेत.