मुंबई प्रतिनिधी :
दि. ०१ जुलै २०२५
आषाढ महिना सुरू झाला की, वारकऱ्यांना आणि विठ्ठलाच्या भक्तांना पंढरपूरला जाण्याची ओढ लागते. वारकरी भर पावसात फक्त विठुरायाचं दर्शन व्हावं याकरिता पायी चालत पंढरपूरला जातात. त्यांचा तो आनंद गगनात मावेनासा असतो. सगळं आजारपण, शीण विठ्ठलाच्या वारीत सहभागी झाल्यावर निघून जातो. काही कलाकारसुद्धा या वारीत सहभागी होतात आणि विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. त्याचे अनुभवसुद्धा हे कलाकार चाहत्यांसोबत शेअर करतात. अशातच आता एका मराठी अभिनेत्यानं विठुरायाचा विलक्षण अनुभव सांगितला आहे.
मराठी अभिनेते अतुल तोडणकर नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांचं भरघोस मनोरंजन करतायत. नुकतीच अतुल आणि त्यांच्या पत्नीनं ‘हंच’ मीडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यांनी पंढरपूरला जाण्याचा आणि विठ्ठलाच्या दर्शनाचा अनुभव सांगितला आहे. कार्तिकी एकादशीला अतुल आणि त्यांची पत्नी पंढरपूरला गेले होते. त्यादरम्यानचा अनुभव सांगत अतुल तोडणकर म्हणाले की, ‘मी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला गेलो होतो आणि आम्हाला लक्षात पण नाही आलं, आज कार्तिकी एकादशी आहे म्हणून. तेव्हा प्रचंड गर्दी. मला ज्यांनी फोन केला होता, त्यांनी सांगितलं की, आज का आलात? आज सात ते आठ लाख लोकं आहेत पंढरपूरला.’
“आम्ही जातो काय, तिथे गाडी पार्क करतो काय, तिथून एक माणूस येतो काय आणि आम्हाला घेऊन जातो काय. आम्हाला वाटलं, मुखदर्शन होईल; पण तो म्हणाला मुखदर्शन नाही. मी विचारलं, विठ्ठल कुठे तर तो म्हणाला हे काय? समोर. समोर बघतो तर काय! इतक्या गर्दीत आम्ही विठ्ठलाच्या मूर्तीसमोर बघून रडत होतो. जिथे आपण जाऊ शकत नाही, आपल्याला वाटतं मुखदर्शन होईल. पण, व्यवस्थित दर्शन होतं काय, अगदी चंद्रभागेमध्ये एवढी गर्दी असूनसुद्धा तुमचे पाय धुतले जातात काय. मग मला जाणवलं ‘तो’ कुठेतरी आहे.” असा विलक्षण अनुभव अतुल यांनी सांगितला आहे. पुढे त्यांची पत्नी म्हणाली की, “तेव्हपासून अतुल खूप आध्यात्मिकसुद्धा झालाय.”