पुणे प्रतिनिधी :
दि. ०४ जुलै २०२५
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात जय गुजरात चा नारा दिलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत कोंडवा येथे झालेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी भाषणात अमित शहांचं तोंडभरुन कौतुक केलं. भाषणाचा समारोप करताना त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशा घोषणा दिल्या. शिंदेंनी दिलेल्या जय गुजरात घोषणेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. भाषण संपवताना शिंदे जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणाले. यानंतर ते क्षणभर थांबले. यानंतर त्यांनी जय गुजरात अशी घोषणा दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे पुण्यात चार कार्यक्रम आहेत. राष्ट्रीय सुरक्षा अकादमीत त्यांचा पहिला कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर ते कोंडवा येथे असलेल्या जयराज स्पोर्ट्स आणि कन्वेन्शन सेंटरच्या उद्घाटनाला पोहोचले. शहरातील गुजराती वर्गाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शहांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारदेखील उपस्थित होती. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं झाली. त्यातील शिंदे यांचं भाषण विशेष लक्षवेधी ठरलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शहांचं तोंडभरुन कौतुक केलं. भाषणाचा समारोप त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात या घोषणेनं केला. जय हिंद, जय महाराष्ट्र म्हटल्यानंतर शिंदे काहीसे थांबले. क्षणभर ते माईकपासून दूर गेले. पण पुढच्याच क्षणाला माईकजवळ येऊन ते जय गुजरातचा नारा देऊन गेले. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
शिंदे यांच्या जय गुजरात घोषणेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. ‘बाळासाहेबांच्या विचारावर चालत असल्याचं शिंदे शिवसेनेतून बाहेर पडताना म्हणाले. जय गुजरात हे बाळासाहेबांचे विचार कधीपासून झाले,’ असा सवाल शिवसेना उबाठाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी विचारला. शिंदे यांनी दिलेल्या जय गुजरात घोषणेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्यानं दखल घ्यावी. कारण ते संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते राज्याचं नेतृत्व करतात, असं पेडणेकर म्हणाल्या.
आपण बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक असल्याचं शिंदे सांगत असतात. पण जय गुजरात म्हणणारे कसले बाळासाहेबांचे आणि महाराष्ट्राचे पाईक? हे तर गुजरातचे पाईप. या पाईपमधून काय काय वाहत असेल ते शिंदे यांनाच माहीत, असा खोचक टोला पेडणेकर यांनी लगावला. मुंबई गुजरातला मिळावी, असं मोरारजी देसाई यांचं स्वप्न होतं. ते पूर्ण करण्यासाठी शिंदेंनी गद्दारी केली का, असा सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केला.