मुंबई प्रतिनिधी :
दि. २२ जळई २०२५
‘काटा रुते कुणाला’, ‘अधुरी एक कहाणी’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्नेहा वाघ वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने ‘एक वीर की अरदास… वीरा’, ‘चंद्रगुप्त मौ र्य’, ‘नीरजा : एक नयी पहचान’ अशा गाजलेल्या हिंदी मालिकाही केल्या आहेत. तसेच ‘बिग बॉस मराठी 3’मधून तिला विशेष लोकप्रियता मिळाली. सध्या अभिनेत्री कृष्णभक्तीत रंगली असून, तिने नुकतेच एका मुलाखतीमध्ये हा अनुभव नेमका कसा आहे, याविषयी सांगितले.
या मुलाखतीत स्नेहाने सांगितले की, ती सध्या वृंदावनमध्येच वास्तव्यास आहे, मुंबईत केवळ कामानिमित्ताने येते. ती म्हणाली की, ‘मला आजकाल दुसरीकडे कुठे जाणं आवडतंच नाही, फक्त वृंदावन… वृंदावन आणि वृंदावन!’ ती म्हणाली की, दिवसरात्र, सकाळी किंवा रात्री झोपताना ती केवळ वृंदावनाचाच विचार करते.
अलीकडेच ती फिल्मफेअर सोहळ्यातही वृंदावन आणि परिसरात लोकप्रिय असमाऱ्या ‘गोपी ड्रेस’मध्ये दिसली होती. ग्लॅमरस लूकसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या इंडस्ट्रीतील एका कार्यक्रमात स्नेहाला अशाप्रकारे गोपी ड्रेसमध्ये पाहून, अनेकांना आश्चर्य वाटले. तिने स्वीकारलेल्या जीवनशैलीविषयी स्नेहा म्हणाली की, ‘मी सुरुवातीपासूनच कधी फॅशनेबल नव्हते, ते स्टायलिस्टचं काम असायचं. ते मला विविध कपडे घालण्यासाठी द्यायचे, पण तुम्ही मला घरी बघितलं असतं तर मी एकदमच सामान्य असते. मला सैलसर कपडे आवडतात, कपड्यांचा आपल्याला त्रास होता कामा नये, असं मला वाटतं. वृंदावनमध्ये गेल्यानंतर या गोपी ड्रेसपेक्षा आरामदायक असं दुसरं काही नाही आहे.’ ती म्हणाली की गेल्यावर्षीपासून तिने आता कायमस्वरुपी गोपी ड्रेस घालण्यास सुरुवात केली आहे.
वृंदावनची ओढ कशी लागली याविषयी बोलताना ती म्हणाली की, तिला 3 दिवसांच्या एका कार्यक्रमासाठी तिथल्या चंद्र मंदिरातून निमंत्रण आले होते. एक अभिनेत्री म्हणून तिला त्याठिकाणी ‘वृंदावनची महिमा’ दाखवण्यासाठी बोलावले होते, असे ती म्हणाली. अभिनेत्रीला आधी तशाप्रकारे आलेलं निमंत्रण एक स्कॅम असल्याचे वाटले, मात्र नंतर तिने खात्री करुन घेतल्यानंतर मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला.
ती म्हणाली की, ‘पण असं झालं की, त्या तीन दिवसातून मी बाहेरच येऊ शकले नाही. वृंदावनमधून मी बाहेर आले, पण वृंदावन माझ्यातून बाहेर आलं नाही. मुंबईत मी राहूच शकत नव्हते. मला झोप लागत नव्हती, सकाळी माझे 5 वाजता डोळे उघडायचे आणि मला असं वाटायचं की, मी इथे काय करतेय?’
स्नेहाने पुढे म्हटले की, ‘मला स्वत:च्या घरातच अस्वस्थ वाटत होते. माझी वृंदावनमध्ये रितीका दीदी यांच्याशी मैत्री झाली होती, मी त्यांना फोन करुन सांगितलं की, मी इथे राहू नाही शकत. मला स्वप्नातही त्याच गोष्टी येत होत्या की, वृंदावनमध्ये फिरतेय वगैरे…तेव्हा त्यांनी म्हटले की, ‘स्नेहा कृष्णाची दृष्टी तुझ्यावर पडली आहे…’ एक मुंबईकर म्हणून माझ्यासाठी ते नवीन होतं.
अभिनेत्री म्हणाली की, ‘मग मी त्याविषयी इतर ठिकाणी बघायला लागले, वाचायला लागले… तेव्हा मला कळलं की, जेव्हा कृष्णाची दृष्टी तुमच्यावर पडते ना, जेव्हा कृष्ण तुमचा हात पकडतो ना… तो मग तो कधीच सोडत नाही. मग तुम्ही कृष्णप्रेमीच होणार, त्याशिवाय तुम्हाला तो कुठे जाऊ देणार नाही.’
अभिनेत्री वृंदावनमधून ‘माखनचोर’ म्हणजेच बाळकृष्णाची एक मूर्तीही तिच्या घरी घेऊन आली आहे. एखाद्या लहान बाळाचे ज्याप्रमाणे संगोपन करतात, त्याप्रमाणे ती त्या मूर्तीची काळजी घेते. कुठेही बाहेर जाताना, देवदर्शनासाठीही माखनचोरसोबतच जाते. अभिनेत्रीने असे म्हटले की, त्याच्या बाबतीत तिला विविध अनुभव आले आहेत. तिने इन्स्टाग्रामवर @my_makhanchor नावाने अकाउंटही तयार केले आहे.
तिने असेही म्हटले की, ‘वृंदावनमध्ये कृष्णाला देव कोणी मानत नाही. तो एकतर तुमचा लहान मुलगा ‘लाला’ आहे किंवा तो भाऊ, मित्र, नवरा, प्रेमी, पिता किंवा गुरू आहे. कोणीही त्याच्याशी देव म्हणून बोलत नाही. ही ब्रजमधील भावना आहे. तुम्ही मंगलआरतीसाठी गेलात, तर आजही बायका तिथे यमुनाजल घेऊन येतात आणि त्याला म्हणतात की, तुझ्यासाठी मी धावत आले, मला दर्शन दे.’