नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. २२ जुलै २०२५
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ऑगस्ट महिन्यात निवड होण्याची शक्यता आहे आणि या पदासाठी हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर , केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान , भूपेंद्र यादव यांच्यासह कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नावाची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आशीर्वाद असलेले, ओबीसी चेहरा असलेले नेते या पदासाठी योग्य मानले जात आहेत. शिवराज सिंह चौहान यांनी थेटपणे दावेदारी न करता, नवीन भूमिकेसाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेक नावे चर्चेत आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आशीर्वाद ज्याला असेल, असा ओबीसी चेहरा असणारा नेता निवडला जाण्याची शक्यता आहे. शिवराज सिंह चौहान यांनी जरी थेटपणे अध्यक्षपदासाठी दावेदारी केली नसली, तरी त्यांनी नवीन जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत. मध्य प्रदेशमध्ये केलेले काम पुरेसे आहे, असे सांगून त्यांनी आता पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याची तयारी दर्शवली आहे.
शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशातील राजकारणाला रामराम केला आहे. मध्य प्रदेशातील माझी वेळ संपली आहे, असे चौहान म्हणाले. केंद्रात मंत्री झाल्यावरही शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेशमध्ये सक्रिय होते. त्यामुळे त्यांना राज्याच्या राजकारणात अजूनही रस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. शिवराज यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कायम आशीर्वाद राहिला आहे.
इंडिया टुडेच्या पॉडकास्टमध्ये बोलताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, मी मध्य प्रदेशात खूप काम केलं आहे. मध्य प्रदेशासाठी चांगले काम करु शकलो, याबद्दल मी समाधानी आहे. महिलांसह लहान मुलांच्या भल्यासाठी काम करत आल्याचा आनंद आहे. तेथील जनतेनेही मला खूप प्रेम दिले. पण आता तिथे काम करण्याची माझी वेळ संपली आहे. आता पक्षाने आणि पंतप्रधानांनी दिलेले काम मी दिवसरात्र करेन. त्याव्यतिरिक्त मला अन्य काही दिसत नाही, असे चौहान म्हणाले. तुम्ही जर देशात सक्रिय असाल, तर त्यात मध्य प्रदेशही येतो, असेही केंद्रीय कृषीमंत्री असलेले चौहान यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासाठी मी आता आव्हान नाही, असे चौहान यांनी सांगितले. मध्य प्रदेश सरकार चांगले काम करत आहे आणि मी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या चांगल्या कामांना पाठिंबा देत आहे, असे चौहान म्हणाले. राज्यात सहकुटुंब पदयात्रा करण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी कोणताही कार्यक्रम माझ्या मतदारसंघासाठी करतो. जर सरकारने बोलावले तर राज्यातील कार्यक्रमांमध्ये सहभागी होतो. बुधनी मतदारसंघ माझे कुटुंब आहे. त्याबद्दल माझ्या मनात विशेष स्थान आहे, असे चौहान यांनी सांगितले.
मध्य प्रदेशात प्रदीर्घकाळ सरकार चालवण्याचा अनुभव शिवराज सिंह चौहान यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे केंद्रात काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी मध्य प्रदेशात भाजप वाढवला आणि सत्ताही राखली. २०२४ मध्ये महाराष्ट्रात लागू करण्यात आलेली योजना सर्वप्रथम मध्य प्रदेशात शिवराज सरकारनेच लागू केली होती. लाडली बहना नावाने सरकारने योजना आणली. त्याचा सरकारला बंपर फायदा झाला. शिवराज यांची महिलांमधील प्रतिमा पाहता त्यांना ‘मामा’ म्हटले जाते. मध्य प्रदेशातील महिला वर्गाचे मामा आता थेट भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.