उमरेड प्रतिनिधी :
दि. ३१ जुलै २०२५
उमरेड तालुक्यातील चांपा, हळदगाव, डव्हा,खापरी, परसोडी, सायकी तिखाडी, उमरा आदी 20 गावांना व उमरेड नागपूर महामार्ग तसेच उमरेड बुटीबोरी महामार्गा ला जोडणाऱ्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा संयम सुटला आहे. ३० जुलै २०२५ रोजी या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातानंतर विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाला जाग आणली. “आम्ही शिक्षणासाठी जातो, मरणासाठी नाही!” असा संतप्त सूर काशीश निकोसे, प्रीत छापेकर, क्रिस्ट्री मळावी, ऋतुजा छापेकर, प्राची वळके, दीपिका मडवी, समीक्षा उईके, टीना ताजने, आदित्य छापेकर, नैतिक निकोसे, गौरव वंजारी, मालवी ढगे, जानवी ढगे, शिवानी निकोसे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. या आंदोलनाने प्रशासनाला तात्पुरत्या दुरुस्तीची पावले उचलण्यास भाग पाडले असले, तरी सिमेंट कॉंक्रिट रस्ता आणि क्रेशर प्लांटच्या धुळीवर कायमस्वरूपी उपाय यांचा प्रश्न कायम आहे.
30 जुलै रोजी हळदगाव-परसोडी-खापरी मार्गावरील खड्ड्यांमुळे महामंडळाची एसटी बस पलटी होण्यापासून थोडक्यात बचावली. या अपघातात तनुश्री नारनवरे, श्रुती नारनवरे, भावना ताजने, अनुजा राऊत, टीशा ढगे आदी विद्यार्थी जखमी झाले. “जीव मुठीत धरून शाळेत जावं लागतं. रस्त्यावर पाण्याखाली खड्डेच खड्डे आणि क्रेशरच्या धुळीमुळे श्वास घेणंही कठीण आहे,” अशी खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या घटनेनंतर सकाळी ११ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत चांपा-हळदगाव फाट्यावर विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. या आंदोलनाला ग्रामस्थांनीही पाठिंबा दिला आणि मोठी गर्दी जमली. “आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास जनआंदोलन करू,” असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.
आंदोलनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार मनोहर चव्हाण आणि कुही पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर अधिकाऱ्यांनी चांपा ते परसोडी बसप्रवास करत रस्त्याच्या दयनीय अवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 80 कोटी रुपये खर्चून रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याचे निर्देश दिले आणि “दिवाळीपर्यंत रस्त्याचे काम सुरु होईल,” असे आश्वासन दिले. तात्पुरत्या दुरुस्तीसाठी क्रेशर प्लांट मालकांना खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना प्रश्न आहे, “हे उपाय किती काळ टिकणार?”
या मार्गावर डझनभर क्रेशर प्लांटमुळे शेकडो ओव्हरलोड ट्रक चांपा टोल टाळण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. यामुळे दररोज सुमारे ५ लाख रुपये महसूल बुडतो आणि आतापर्यंत १५० कोटींचे नुकसान झाल्याचा दावा माजी सरपंच अतिश पवार यांनी केला. “क्रेशरच्या विषारी धुळीमुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आहे. ४० टन क्षमतेचा सिमेंट कॉंक्रिट रस्ता आणि धुळीवर कायमस्वरूपी उपाय हाच पर्याय आहे,” अशी मागणी माजी सरपंच अतिश पवार यांनी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्याकडे केली.
आंदोलनात हळदगाव सरपंच गोविंदा हाते, पाचगाव सरपंच चेतन फटिंग, मांगली सरपंच मंजुषा टोंगे,माजी सरपंच अतिश पवार, शेतकरी सुनील पोहणकर,सामाजिक कार्यकर्ते ऍड. सुमित जैस्वाल, जगदीश सोनवणे, महेश धाबेकर, संगीता नेवारे, जिजाबाई छापेकर, रोशन नेवारे, चंदू नेवारे यांच्यासह शेकडो विद्यार्थी आणि ग्रामस्थ सहभागी झाले. “आमच्या मुलांचे जीव धोक्यात आहेत. आश्वासनं पुरे, आता ठोस कृती हवी,” अशी मागणी त्यांनी लावून धरली.
या आंदोलनाने चांपा, हळदगाव, खापरी, परसोडी, तिखाडी, उमरा, फुकेश्वर, सायकी, डव्हा गावांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. अलीकडील राजस्थानच्या शाळा इमारतीच्या दुर्घटनेचा दाखला देत, अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी आहे. सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे काम वेळेत पूर्ण होईल का? क्रेशर प्लांटच्या धुळीवर कायमस्वरूपी उपाय होईल का? याची शाश्वती नसल्याने ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
शाळकरी विद्यार्थ्यांनी दाखवलेली एकजूट आणि धैर्य प्रशंसनीय आहे. त्यांच्या आंदोलनाने प्रशासनाला खडबडून जाग आणली, हा त्यांचा विजय आहे. मात्र, आश्वासनांऐवजी ठोस कृतीशिवाय हा लढा अपूर्ण राहील. सिमेंट कॉंक्रिट रस्ता, क्रेशर प्लांटच्या धुळीवर नियंत्रण आणि सुरक्षित प्रवासाची हमी देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि ग्रामस्थांच्या न्यायासाठी आता वेळ न दवडता कृतीची गरज आहे.