डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. २० जानेवारी २०२६
दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्राने पहिल्याच दिवशी विक्रमी कामगिरी करत जगभरातील उद्योगविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने तब्बल १४ लाख ५० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले असून या गुंतवणुकीतून सुमारे १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. आयटी, डेटा सेंटर्स, हरित ऊर्जा, लॉजिस्टिक्स, ऑटोमोबाईल, पोलाद निर्मिती, अन्न प्रक्रिया, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध क्षेत्रांत ही गुंतवणूक होत आहे.
जागतिक स्तरावरील अनेक नामांकित कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक आणि विस्तारासाठी पुढाकार घेतला आहे. अन्न प्रक्रिया आणि कृषी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कार्लसबर्गने राज्यातील उद्योगस्नेही धोरणांचे कौतुक करत गुंतवणूक वाढवण्याची तयारी दर्शवली आहे. कंपनीचे सीईओ जेकब अँडरसन यांनी महाराष्ट्रातील स्थिर धोरण, सुलभ प्रशासन आणि पायाभूत सुविधांची विशेष प्रशंसा केली. तसेच कंपनी भविष्यात आयपीओ आणण्याच्या दृष्टीनेही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
हरित आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात योकी ग्रीन एनर्जीसारख्या कंपन्या महाराष्ट्राकडे आकर्षित झाल्या असून, स्वच्छ ऊर्जेच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचा त्यांचा मानस आहे. यामुळे पर्यावरणपूरक विकासासोबतच स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. पोलाद आणि स्टील उद्योगात बीएफएन फोर्जिंग्स आणि सुरजागड इस्पात यांसारख्या कंपन्यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याने त्या भागाच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) रिअल इस्टेट, लॉजिस्टिक्स आणि शहरी पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात जागतिक आणि देशांतर्गत कंपन्यांनी मोठा विश्वास दाखवला आहे. सुमिटोमो रियालिटी, के. रहेजा समूह, अल्टा कॅपिटल व पंचशील, एसबीजी समूह आणि आयआयएसएम ग्लोबल यांसारख्या कंपन्या एमएमआरमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असून, स्मार्ट सिटी, लॉजिस्टिक्स हब, निवासी व व्यावसायिक प्रकल्पांमुळे लाखो रोजगार संधी निर्माण होणार आहेत.
आयटी आणि डेटा सेंटर्स क्षेत्रात लोढा डेव्हलपर्सने भरीव गुंतवणुकीची घोषणा केली असून, डिजिटल इकॉनॉमीला चालना देणाऱ्या या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र देशातील टेक्नॉलॉजी हब म्हणून अधिक बळकट होणार आहे. याशिवाय कोका-कोला, आयकिया आणि स्कोडा ऑटो यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी महाराष्ट्रात आपली विद्यमान गुंतवणूक वाढवण्याची आणि नवीन प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शवली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग प्रतिनिधींशी झालेल्या चर्चांमध्ये स्पष्ट केले की, महाराष्ट्रातील गुंतवणूक करारांची अंमलबजावणी वेळेत आणि प्रभावीपणे होण्यासाठी ‘वॉर रूम’च्या माध्यमातून सातत्याने लक्ष ठेवले जाईल. उद्योगांना आवश्यक सुविधा, परवानग्या आणि पायाभूत सोयी दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा सरकारचा ठाम संकल्प असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
जागतिक कंपन्यांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता, यंदा गतवर्षीपेक्षा अधिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “महाराष्ट्र हे केवळ भारताचेच नव्हे, तर भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस आहे.”



