मुंबई प्रतिनिधी :
दि. २१ जानेवारी २०२६
यंदाची मुंबई महानगरपालिका निवडणूक मोठ्या प्रमाणात ठाकरे बंधूंच्या भूमिकांभोवतीच फिरताना दिसली. सत्ता मिळवण्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनाही यश आलं नसलं, तरी संभाव्य युतीमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या दोन भावांकडे लागून राहिलं होतं. निवडणूक प्रक्रियेनंतर आता पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे संयुक्त कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मंगळवारी शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम केवळ स्मरणाचा नसून विचारांचा आणि दिशादर्शक ठरेल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ठाकरे बंधू पहिल्यांदाच एका मंचावर येत असल्याने, या व्यासपीठावरून निवडणूक निकालांवर आणि भविष्यातील राजकीय वाटचालीवर भाष्य होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
बिहार भवन वादात नवा राजकीय ट्विस्ट
मुंबईत बिहार भवन उभारण्यावरून सुरू असलेल्या वादात आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) नेही भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बिहार भवनविरोधातील भूमिका राज्यघटनेच्या विरोधात असल्याचा आरोप रिपाइं (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
मुंबईत बिहार भवन तसेच झारखंड भवन उभारण्यास विरोध करणे हे संविधानाच्या चौकटीबाहेर असल्याचे सांगत, आठवले यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. मनसेने सोमवारी मुंबईत बिहार भवन उभारू दिले जाणार नाही, अशी ठाम भूमिका जाहीर केल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी मंगळवारी आपली स्पष्ट भूमिका मांडली असून, या मुद्द्यावर पुढील काही दिवसांत राजकारण अधिक रंगण्याची शक्यता आहे.






