पुणे (बारामती) प्रतिनिधी :
दि. २८ जानेवारी २०२६
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी सकाळी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. या भीषण दुर्घटनेत त्यांच्यासह विमानातील आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अचानक जाण्याने त्यांचे कार्यकर्ते अक्षरशः पोरके झाले असून सर्वत्र शोकाकुल वातावरण आहे. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू असून, ही बातमी अजूनही स्वीकारणं कठीण जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच पुतण्या युगेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर झाल्याचं दृश्य पाहायला मिळालं. “दादा अशा प्रकारे अचानक निघून जातील,” यावर कुणाचाच विश्वास बसत नाही. त्यांचं पार्थिव ज्या रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली असून, सगळीकडे हंबरडा आणि आक्रोश ऐकू येत आहे.
अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर सभेत दिलेला सल्ला आज सर्वांच्या मनात घर करून राहिला आहे. चाकण येथील सभेत बोलताना त्यांनी लोकांना राजकारणापेक्षा व्यवसाय आणि कुटुंबाकडे लक्ष देण्याचा स्पष्ट सल्ला दिला होता. “राजकारण फार वंगाळ आहे. जमिनीचे पैसे हातात आले म्हणून लगेच राजकारणात उडी घेऊ नका. धंदा-पाणी करा, मस्त जगा, मुलाबाळांना चांगलं शिक्षण द्या आणि निर्व्यसनी आयुष्य जगा,” असं ते ठामपणे म्हणाले होते.
ते पुढे म्हणाले होते की, काही जणांना थोडे पैसे मिळाले की लगेच निवडणुकीची हौस लागते. “बायकोला उभं करा, तू निवडणूक लढ,” असं करणं योग्य नाही. पैसे संपले की पुढे काय करणार? दोन हाताला चुना लावून काहीच साध्य होत नाही. साधुसंतांनीही नेहमी ‘धंदा सांभाळा आणि आयुष्य नीट जगा’ हाच उपदेश केला आहे,” असे शब्द त्यांनी वापरले होते.
या विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विदीप जाधव (खासगी सुरक्षारक्षक), सुमित कपूर (पायलट कॅप्टन), शांभवी पाठक (को-पायलट) आणि पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पवार कुटुंबीय बारामतीकडे रवाना झाले आहेत. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया पवार दिल्लीहून निघाल्या असून, शरद पवार आणि प्रतिभा पवार हे देखील बारामतीत दाखल झाले आहेत. युगेंद्र पवार, रोहित पवार आणि मुलगा जय पवार हे रुग्णालयात उपस्थित आहेत. संपूर्ण महाराष्ट्र आज शोकसागरात बुडालेला दिसत आहे.






