पुणे प्रतिनिधी :
दि. २९ जानेवारी २०२६
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात दुःखद निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे येत असताना लँडिंगच्या वेळी विमानाला अपघात झाला. या दुर्घटनेत दादांसह पाच जणांचा मृत्यू झाला.
निडर नेतृत्व, ठाम भूमिका, स्पष्ट वक्तव्य आणि कामाला प्राधान्य देणारा नेता अशी ओळख असलेले अजित पवार आज अचानक काळाच्या पडद्याआड गेले, यावर अजूनही कुणाचाच विश्वास बसत नाहीये. दादांची अकाली एक्झिट संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठा धक्का ठरली आहे.
दादांची जुनी भाषणं, पत्रकार परिषदांचे व्हिडीओ पाहताना आज अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आहेत. कारण सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून मन अधिकच हेलावून जातंय. या व्हिडीओमध्ये दादांनी काळ, नियती आणि आयुष्याबाबत केलेलं भाष्य आज अक्षरशः वास्तवात उतरल्यासारखं वाटतंय.
त्या भाषणात दादा म्हणाले होते, “कोणाचंही काम यमाकडे थांबत नाही. आज आपण आहोत, उद्या नसू. काळाचं आणि नियतीचं बोलावणं आल्यानंतर प्रत्येकालाच जायचं आहे. पण आपल्या हयातीत काम करताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की राजकारण म्हणजे सर्वस्व नाही. निवडणुका संपल्या की राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे. मात्र ज्यामुळे त्या भागाचा विकास होईल, आर्थिक समृद्धी येईल, ते काम झालंच पाहिजे.”
भाजपचे नेते महेश लांडगे यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ अपघाताच्या अवघ्या चार दिवसांपूर्वीचा आहे.
सरळ, स्पष्ट आणि मनातलं तोंडावर बोलणारा नेता म्हणून दादा सर्वसामान्यांना आपलासा वाटायचा. अपघाताची बातमी समजताच सुरुवातीला कुणालाच ती खरी वाटली नाही. मात्र नियतीसमोर कुणाचाही निभाव लागत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
आज महाराष्ट्रभर प्रत्येकाच्या मोबाईलच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर दादांचा फोटो झळकतोय. सत्ताधारी, विरोधक, जात-पात, पक्षभेद सगळं बाजूला ठेवून सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जातोय. इतकी खोल छाप दादांनी जनतेच्या मनावर उमटवली होती.
महापालिका निवडणुकांनंतर दादा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला लागले होते. अपघाताच्या दिवशीही त्यांच्या चार सभा नियोजित होत्या. मात्र काळाने त्यांना बारामतीत पाऊल टाकण्याआधीच आपल्यापासून हिरावून घेतलं.
महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी आज निर्माण झाली आहे. शब्दाचा पक्का आणि कामाचा माणूस असलेला ‘दादा’ आज आपल्यात राहिला नाही, ही जाणीव स्वीकारणं आजही कठीण वाटतंय…






