डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. १६ फेब्रुवारी २०२६
२८ जानेवारी रोजी घडलेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याच्या क्षणी विमानावरील नियंत्रण सुटले आणि ते जमिनीवर आपटले. धडकेनंतर मोठा स्फोट होऊन विमानाला आग लागली आणि क्षणात संपूर्ण यंत्रणा जळून खाक झाली.
या दुर्घटनेच्या दुसऱ्याच दिवशी घटनास्थळावरून विमानातील ब्लॅक बॉक्स हस्तगत करण्यात आला होता. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा ब्लॅक बॉक्स अंशतः जळालेल्या अवस्थेत सापडला असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे त्यातील डेटा सुरक्षित आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ब्लॅक बॉक्समधील माहिती पुनर्प्राप्त (डेटा रिकव्हरी) करण्यासाठी तो परदेशातील तज्ज्ञ प्रयोगशाळेत पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात पुढील एक ते दोन दिवसांत केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, अपघाताच्या कारणांबाबत विविध स्तरांवर शंका व्यक्त होत असल्याने ब्लॅक बॉक्समधील माहिती अत्यंत निर्णायक ठरणार आहे. डेटा यशस्वीरीत्या मिळाल्यानंतर दुर्घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






