डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. १७ फेब्रुवारी २०२६
ईडी प्रकरणासंदर्भात सत्र न्यायालयात हजेरी लावल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी तपास प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांच्या प्रकरणात अजित पवार यांच्यासह इतर काही नेत्यांचाही समावेश असल्याचे सांगत त्यांनी बँक व्यवहारांमध्ये कोणतीही अनियमितता झालेली नसल्याचा दावा केला. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) हा विषय संपल्याचे ईडीला कळवले असतानाही तपास सुरू ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
१३ तारखेला न्यायालयात ईडीने राज्य सरकारविरोधात भूमिका मांडत अधिक सखोल चौकशीची गरज व्यक्त केली, असे ते म्हणाले. मात्र न्यायालयीन प्रक्रियेत आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि शेवटी विजय आपलाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्या सत्तेत असलेल्या काही नेत्यांवरही ईडीचे प्रकरणे प्रलंबित असून त्यांच्यावरील कारवाई का होत नाही, असा प्रश्न नागरिकांना पडत असल्याचे पवार म्हणाले. हा विषय दिल्लीपर्यंत गेला असताना “नेत्यांना सोडू नका” असे निर्देश मिळाल्याचे सांगितले जात असल्याने राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकांमध्ये विरोधाभास दिसतो, असे त्यांनी नमूद केले.
विरोधात असल्यामुळे संघर्ष करणे भाग आहे; मात्र सत्तेत असल्यामुळे आपण सुरक्षित आहोत असे मानणाऱ्यांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या चर्चेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ही बातमी त्यांना दूरचित्रवाणीवरून समजली. पक्षातील अनेक आमदार व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले आणि सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
विलिनीकरणाच्या चर्चांबाबत त्यांनी स्पष्ट केले की, अजित पवार आता आपल्यात नसल्याने त्या विषयावर चर्चा करणे गौण ठरते. काही नेते स्वतःचे महत्त्व टिकवण्यासाठी हा मुद्दा पुन्हा पुन्हा उपस्थित करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटींविषयी बोलताना त्यांनी मोठा दावा केला. जयंत पाटील यांच्या घरासमोर उद्योगपती अभिषेक लोढा यांचे घर असून मागील दीड वर्षातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तर अजित पवार १३–१४ वेळा तेथे भेटीस गेले होते, हे स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.







