मुंबई प्रतिनिधी :
दि. १७ फेब्रुवारी २०२६
दिग्दर्शक आदित्य धर यांच्या ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवल्यानंतर त्याच्या सिक्वेलची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ‘धुरंधर 2’ हा चित्रपट १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार असला तरी रिलीजपूर्वीच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत बीएमसी प्रशासनाने निर्मात्यांविरोधात कारवाईचा प्रस्ताव ठेवला आहे.
महापालिकेच्या A वॉर्ड कार्यालयाने उपायुक्तांना पाठवलेल्या पत्रात आदित्य धर यांच्या B62 Studios ला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. शूटिंगदरम्यान वारंवार सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.
मनपाच्या आरोपांनुसार, सेटवर परवानगी नसताना स्वयंपाकासाठी गॅसचा वापर करण्यात आला तसेच मंजुरी नसलेल्या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले. याशिवाय उच्च सुरक्षा क्षेत्रात ज्वलंत मशाली वापरणे ही गंभीर सुरक्षा त्रुटी मानली गेली. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी हस्तक्षेप करून काही उपकरणे जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच क्रू सदस्यांनी परवानगीशिवाय शूटिंगचे ठिकाण बदलल्याचा, इमारतीच्या टेरेसचा विनापरवाना वापर केल्याचा आणि स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता दोन जनरेटर व्हॅन चालू ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महानगरपालिकेने राज्याच्या सिंगल-विंडो फिल्मिंग पोर्टलमार्फत या स्टुडिओवर भविष्यातील शूटिंग बंदीचा प्रस्ताव दिला असून कारवाईचा भाग म्हणून २५ हजार रुपयांची सुरक्षा ठेव जप्त करण्यात आली आहे. तसेच १ लाख रुपयांचा अतिरिक्त दंड आकारण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे. मात्र अद्याप स्टुडिओला अधिकृतपणे ब्लॅकलिस्ट करण्यात आलेले नाही.
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये रणवीर सिंग सोबतच संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि राकेश बेदी यांच्याही भूमिका आहेत.







