राहुरी प्रतिनिधी :
दि. १८ फेब्रुवारी २०२६
राहुरी येथे आयोजित फुले कृषि महोत्सव-२०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. कृषि विद्यापीठ, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन व विविध सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवात थेट पीक प्रात्यक्षिके, शिवार फेरी, कृषि प्रदर्शन व तंत्रज्ञान प्रसार उपक्रम राबविण्यात आले.
कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती दत्तात्रय भरणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की शेतकऱ्यांची प्रगती ही कृषि विद्यापीठांनी विकसित केलेल्या वाणांमुळेच शक्य झाली आहे. शेतीत महिला भगिनी अग्रस्थानी असून त्यांच्या श्रमाची बचत करणारे संशोधन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. शासन शेतकरीहितासाठी ५० पेक्षा अधिक योजना राबवत असून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत तंत्रज्ञान व सुविधा पोहोचविण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानावर कुलगुरू डॉ. विलास खर्चे उपस्थित होते. हवामान बदलाशी मुकाबला करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर व शेतकरीकेंद्रित संशोधनावर विद्यापीठ भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे उद्घाटन, कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन, विविध प्रकाशनांचे विमोचन तसेच डिजिटल प्लॅटफॉर्म व अॅप्सचे लोकार्पण करण्यात आले. प्रगतशील महिला शेतकरी तसेच उत्कृष्ट संशोधन कार्य करणाऱ्या शास्त्रज्ञांचा सत्कार करण्यात आला.
पीक प्रात्यक्षिके, सुधार प्रकल्प, बचतगट स्टॉल्स आणि तंत्रज्ञान प्रदर्शनांना शेतकरी व विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे ६ हजारांहून अधिक शेतकरी, विद्यार्थी व कृषि क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.
महिलांची शेतीतील भूमिका, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकरीकेंद्रित संशोधनाचा संदेश देत महोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला.






