पुणे प्रतिनिधी :
14 डिसेंबर 2022
उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदायातील आणि संत ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज आणि एकनाथ महाराज यांच्याबाबत हेतुपुरस्सर टीकात्मक विडंबन केले होते. इतक्यावरच त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी प्रभु रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावरही टीका केली होती. त्यांच्या वक्तव्यावर वारकरी सांप्रदायाने आक्रमक भूमिका घेतली आहे. समाजात संत आणि देवतांचे विडंबन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने देहूरोड पोलिस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदचे अध्यक्ष आणि संत तुकाराम महाराज यांचे वंशज प्रशांत महाराज मोरे, विठ्ठल अण्णा भापकर, सविता गवते, आनंदराव महाराज कदम, श्यामराव महाराज गायकवाड, लक्ष्मण शेरकर आदींनी ही मागणी केली आहे. महाराष्ट्राची शेकडो वर्षांची वारकरी परंपरा ही केवळ संतांच्या विचाराची द्योतक आहे. पण सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यामुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. भागवत धर्माची उभारणी ज्या संतांनी केली त्या संतांचे असे विकृत टीकात्मक विडंबन करणे निषेधार्ह असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी यात करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी निवेदन स्वीकारले.
हा रोष एवढ्यावरच थांबला नाही तर पुढे जाऊन आळंदी येथील वारकरी मुलांनी सुषमा अंधारेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत निषेध व्यक्त केला. आळंदीचे युवा कीर्तनकार महेश अप्पा मडके पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. महेश मडके यांनी अंधारेंच्या प्रतिमेस चपलांचा हार घालत त्यांच्याच शैलीत अंधारेंना उत्तर दिलं. तसेच, वारकऱ्यांनी अंधारे यांना संतांबाबत बोलण्याआधी अभ्यास करण्याचा सल्लाही दिला. वारकरी संप्रदाय जातपात न मानणारा आहे. साधुसंतांनी समानतेचा आणि एकीचा पाया रचल्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं आहे असंही वारकऱ्यांचं म्हणणं आहे.