दिल्ली प्रतिनिधी :
दि. २७ एप्रिल २०२३ :
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ऐषारामी वृत्ती चव्हाट्यावर आली आहे. मी सामान्य जनांचा सेवक असून मला कुठलाही लोभ नाही. मी एक आम आदमी (सामान्य माणूस) आहे अशी बतावणी करणार्या या केजरीवालांचे पितळ आता उघडे पडले आहे. थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नावावर २०१४ साली दिल्लीची सूत्रे आपल्या हाती घेतलेले केजरीवाल अतिशय भ्रष्ट नेते म्हणून समोर येत आहेत. मद्य विक्री योजनेतील कायद्याला चव्हाट्यावर टांगून केलेले फेरफार प्रकरण ताजे असतानाच आता सरकारी पैश्यांतून त्यांनी तब्बल ४५ कोटींचा चुराडा केल्याचे जगजाहीर झाले आहे. हे ४५ कोटी रुपये खर्च केले गेले आहेत घराच्या सुशोभीकरणासाठी म्हणजेच इंटेरियरसाठी!
याचा तपशील जाणून घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंटेरियर डिझाईनच्या कन्सल्टंटलाच १ कोटी रुपये दिले गेले आहेत. वास्तविकतः १ कोटीमध्ये दिल्लीतील NRC किंवा इतर भागात चांगल्यात चांगला फ्लॅट मिळून जातो. सामान्य माणसांना मोफत वीज, मोफत पाणी यांची लालूच दाखवून सत्तेवर आलेल्या केजरीवाल यांनी त्यांच्याच पैश्यांतून ही लूट केल्याचे समोर येत आहे. त्यांच्या घरासाठी मार्बल थेट व्हिएतनामवरुन मागविण्यात आले आणि त्याचा अंदाजे खर्च ६ कोटी रुपये सांगितला जातोय. शिवाय सव्वा कोटी त्याच्या पॉलिशिंगसाठी उडवले आहेत. असेही समजते आहे की आधी हे मार्बल मकराना इथून मागवून काम सुरू झाले होते. पण केजरीवालांनी ते फालतू आहे असे सांगून उखडायला लावले. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की ताजमहालात जो संगमरवर वापरला आहे तो मकराना येथील आहे. आताच्या मार्बलचे वैशिष्ट्य असे की यामध्ये तुमचे प्रतिबिंब आरश्यासारखे लख्ख दिसते. या घरात पडदे १.२५ कोटींचे बसविण्यात आले आहेत. दुमजली या घरात दोन्ही मजल्यांवर किचन आहे आणि पदार्थांची ने आण करण्यासाठी चक्क लिफ्ट आहे जशी बहुमजली पंचतारांकित हॉटेल्समध्ये वापरली जाते. या किचनची किंमतच सुमारे सव्वा कोटी असल्याचे समजते.
२०१४ च्या निवडणुकीआधी ७ जून २०१३ ला जे अफिडेविट स्वतःच्या सहीनिशी केजरीवालांनी दिले होते त्यात मोठा बंगला घेणार नाही, अनावश्यक सिक्युरिटी वापरणार नाही, ही सुरक्षा सामान्य माणसासाठी असायला पाहिजे तसेच लाल दिव्याची गाडी वापरणार नाही सामान्य माणसाचे जीवन जगेन या व अश्या बर्याच शपथा घेतल्या होत्या त्या सगळ्या दिशाभूल करणार्या होत्या हे सिद्ध होते आहे.
या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. भाजपा कार्यकर्ते केजरीवालांच्या घराबाहेर तीव्र निदर्शने करीत आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. शिवाय या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणीही भाजपने केली आहे.